जळगाव, प्रतिनिधी : कासोदा शिवारातील शेतातील पत्री शेडमधून चोरून नेलेल्या तब्बल २३ शेळ्या-बोकडांच्या चोरीचा कासोदा पोलिसांनी छडा लावला आहे. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस पथकाने थेट मध्यप्रदेश गाठत दोन आरोपींना ताब्यात घेतले. चोरीच्या जनावरांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहनही पोलिसांनी जप्त प्रतिनिधी

कासोदा शिवारातील शेतातून १८ शेळ्या आणि पाच बोकड चोरीला गेल्याची घटना ३ सप्टेंबरच्या रात्री घडली होती. शेतमालकाच्या तक्रारीवरून ६ सप्टेंबर रोजी कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत मोठ्या प्रमाणावर जनावरे चोरीला गेल्याने पोलिसांनी तपासाला वेग दिला.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करण्याच्या सूचना कासोदा पोलिसांना दिल्या. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी तांत्रिक तपासाबरोबरच गोपनीय माहितीच्या आधारे चोरीच्या घटनेचे धागेदोरे शोधण्यास सुरुवात केली. तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस पथक मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात पोहोचले.

भगवानपुरा तालुक्यातील बडी गावात पोलिसांनी शोधमोहीम राबवून अजय राजू चौव्हाण (रा. साईखेडी, ता. भगवानपुरा, जि. खरगोन) आणि सोहन विश्राम ब्राम्हणे (रा. बडी, ता. भगवानपुरा, जि. खरगोन) या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत दोघांनी कासोदा परिसरातून शेळ्या-बोकड चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या चोरीतील जनावरांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे.
दोन्ही आरोपींची अधिक चौकशी केली असता चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य व्यक्तींची नावे पोलिसांच्या हाती लागली आहेत. त्यामुळे या प्रकरणातील संपूर्ण टोळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची दिशा बदलली असून, चोरीस गेलेल्या उर्वरित शेळ्या-बोकडांचाही शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. ग्रेड पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील, पोलिस हेडकॉन्स्टेबल किरण गाडीलोहार आणि पोलिस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.









