जळगाव, (प्रतिनिधी) : “घाम खूप येतोय, खांदा दुखतोय, छातीत असह्य वेदना होत आहेत…” सकाळी साडेआठ वाजता आलेला हा फोन केवळ मदतीचा नव्हता, तर मृत्यूशी सुरू असलेल्या झुंजीचा आर्त आवाज होता. मात्र योग्य वेळी घेतलेला निर्णय, डॉक्टरांची तत्परता आणि जळगाव येथील महादेव हॉस्पिटलच्या सज्जतेमुळे निळकंठ वाणी यांना नवजीवन मिळाले आहे.
शहरातील महादेव हॉस्पिटल येथे आयोजित हृदयविकार तपासणी शिबिरादरम्यान ही थरारक घटना घडली. सकाळी ठीक ८:३० वाजता हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी राहुल कुलकर्णी यांच्या मोबाईलवर निलकंठ वाणी यांचा फोन आला. फोनवरील त्यांचा आवाज कमालीचा घाबरलेला होता. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या, खांदा आणि छातीत तीव्र वेदना सुरू होत्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राहुल कुलकर्णी यांनी क्षणाचाही विलंब न करता ही गंभीर हृदयविकाराची लक्षणे असल्याचे ओळखले आणि वाणी यांना तात्काळ महादेव हॉस्पिटलमध्ये येण्याचा सल्ला दिला. दुसरीकडे, रुग्णालयाचे प्रशासक एन. जी. चौधरी यांनी तातडीने सूत्रे हलवून संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर ठेवली.
मुख्य रक्तवाहिनी ९९ टक्के ब्लॉक..
रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचताच हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सिद्धेश खांदे यांनी तात्काळ त्यांची ईसीजी (ECG) तपासणी केली. ईसीजीचा अहवाल पाहताच वाणी यांना अत्यंत गंभीर स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी क्षणाचाही वेळ न दवडता तातडीने उपचार सुरू केले. सुरुवातीला औषधोपचारांद्वारे रक्तदाब नियंत्रणात आणण्यात आला आणि त्यानंतर तातडीने अँजिओग्राफी करण्यात आली. या तपासणीत रुग्णाच्या हृदयातील मुख्य रक्तवाहिनी तब्बल ९९ टक्के ब्लॉक असल्याचे निदर्शनास आले.
शासकीय योजनेतून मोफत शस्त्रक्रिया..
एक-एक सेकंद महत्त्वाचा असताना आणि मृत्यू प्रत्येक क्षणी जवळ येत असताना डॉक्टरांनी तात्काळ अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला आणि ती यशस्वीरित्या पूर्ण केली. विशेष आणि कौतुकास्पद बाब म्हणजे, या अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णाच्या खिशात एक रुपयाही नव्हता. मात्र, रुग्णालयाने पैशांची वाट न पाहता शासन योजनेचा लाभ मिळवून देत संपूर्ण उपचार पूर्णपणे मोफत केले. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर निलकंठ वाणी यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. जर काही मिनिटे उशीर झाला असता, तर आज चित्र वेगळे असते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे अनर्थ टळला!
या संदर्भात माहिती देताना हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सिद्धेश खांदे म्हणाले, “रुग्णाला हॉस्पिटलमध्ये आणण्यात कोणताही विलंब झाला नाही, हीच त्यांचा जीव वाचण्यामागची सर्वात मोठी गोष्ट ठरली. छातीत वेदना, जास्त घाम येणे आणि खांद्यात दुखणे ही हृदयविकाराच्या झटक्याची अत्यंत महत्त्वाची लक्षणे आहेत. ईसीजीमध्ये गंभीर हृदयविकाराचा झटका स्पष्ट झाला होता आणि मुख्य रक्तवाहिनी ९९ टक्के ब्लॉक होती. आम्ही तातडीने अँजिओप्लास्टी करून रक्तपुरवठा सुरळीत केला. योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून रुग्णाची प्रकृती आता उत्तम आहे.”







