जळगाव, (प्रतिनिधी) : भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा गायत्री रूपचंद गौर ऊर्फ गायत्री चेतन भंगाळे यांना नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे. राज्य नगरविकास विभागाने यासंदर्भातील अंतिम आदेश सोमवारी जारी केले असून, २३ एप्रिल २०२६ पासून त्यांना भूतलक्षी प्रभावाने अपात्र घोषित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी:
गायत्री भंगाळे यांनी अनुसूचित जाती (SC) प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवून विजय मिळवला होता. मात्र, त्यांच्या या प्रमाणपत्रावर रजनी सावकारे, प्रमोद सावकारे, राहुल तायडे आणि संजय तायडे यांनी आक्षेप घेत जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रार केली होती.
अपात्रतेचे मुख्य कारण:
सुनावणीदरम्यान तक्रारदारांनी पुराव्यासह असा दावा केला की, गायत्री भंगाळे यांचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील महोबा असून त्यांच्या वडिलांच्या व काकांच्या शालेय नोंदीत ‘कुर्मी’ अशी जात नमूद आहे. नियमानुसार, स्थलांतरित व्यक्तींना दुसऱ्या राज्यात अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. या पुराव्यांच्या आधारे जात पडताळणी समितीने २३ एप्रिल रोजी त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. या निर्णयावर आधारित जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या प्रस्तावानुसार आता नगरविकास विभागाने त्यांच्या निवडीस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
▪️”आम्हाला अद्याप कोणताही अधिकृत शासकीय आदेश मिळालेला नाही. या निर्णयाविरुद्ध आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली असून ५ मे रोजी सुनावणी होणार आहे. आम्ही न्यायालयीन लढा देण्यास सज्ज आहोत.”
गायत्री भंगाळे, नगराध्यक्षा, भुसावळ







