जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा यंदा जळगाव जिल्ह्यात हायटेक देखरेखीखाली पार पडणार आहेत. जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त अभियान’ प्रभावीपणे राबवण्यासाठी ड्रोन कॅमेरे, लाईव्ह स्ट्रीमिंग आणि भरारी पथकांचा कडा पहारा असणार आहे. विशेष म्हणजे, गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध आता थेट अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याचा कडक निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यंदाची आकडेवारी : १ लाख ७ हजार विद्यार्थी मैदानात..
इयत्ता १२ वी: १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ (४८,२३२ विद्यार्थी / ८२ केंद्रे)
इयत्ता १० वी: २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ (५९,४२० विद्यार्थी / १४७ केंद्रे)
असे असेल कडक ‘वॉच’..
ड्रोन आणि व्हिडीओ चित्रीकरण: संवेदनशील आणि उपद्रवी परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे आकाशातून नजर ठेवली जाईल. केंद्राबाहेरील हालचालींचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. प्रत्येक वर्गातील पर्यवेक्षक झूम मीटिंगद्वारे जिल्हा नियंत्रण कक्षाशी जोडले जातील. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातून थेट वर्गावर नजर ठेवता येईल. नाशिक विभागीय मंडळाची ९ पथके आणि जिल्हास्तरीय विशेष पथके कोणत्याही क्षणी केंद्रांना भेटी देतील. तसेच परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत पूर्णपणे बंद राहतील.
वीजपुरवठा आणि पोलीस बंदोबस्त..
परीक्षा काळात विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून महावितरणला अखंडित वीजपुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बाह्य उपद्रव रोखण्यासाठी केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात असेल.








