जळगाव, दि. 23 – केंद्र शासनातर्फे ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत नवी दिल्ली येथे नुकताच जळगाव महानगरपालिकेला वर्ष 2021 करिता पुरस्कार प्रदान केला. याच अभियांतर्गत पुढचे पाऊल म्हणून महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन यांच्या पुढाकारातून जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे ‘शहर स्वच्छता अभियान’ राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शहरातील ज्या भागातील कॉलनी परिसर अथवा तेथील गृहनिर्माण सोसायट्यांतील रहिवासी दररोज घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण व संगोपन, पाण्याचा पुनर्वापर तसेच जल पुनर्भरण असे उपक्रम आदर्श पद्धतीने राबवतील आणि ‘आमची कॉलनी कचरामुक्त आहे’ असे महापालिकेकडे सांगतील त्यांचा सन्मान करू, असे महापौर महाजन यांनी जाहीर केले होते.
त्या अनुषंगाने सर्वेक्षणांतर्गत पात्र ठरलेल्या शहरातील कोल्हेनगर परिसरातील वर्धमान हाइट्स सोसायटी तसेच स्वामी पार्क भागातील रहिवाशांचा महापौर जयश्री महाजन यांनी महापालिका उपायुक्त तसेच अधिकार्यांना सोबत घेत प्रातिनिधिक स्वरूपात रहिवाशांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच संबंधित ठिकाणी ‘आमची कॉलनी कचरामुक्त आहे’ असा फलकही लावण्यात आला.
महापालिका सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त श्याम गोसावी, पवन पाटील, लोमेश धांडे, या भागातील नगरसेविका सिंधुताई कोल्हे, पार्वताबाई भिल, नगरसेवक प्रा.सचिन पाटील याप्रसंगी उपस्थित होते. दरम्यान, शहरातील कोल्हेनगर परिसरातील वर्धमान हाइट्स सोसायटी तसेच स्वामी पार्क भागासह आणखी आठ-दहा कॉलन्यांतील रहिवाशांनी हा अभिनव उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचा आदर्श शहरातील प्रत्येक सोसायटी, अपार्टमेंट तसेच कॉलनी परिसरातील रहिवाशांनी डोळ्यासमोर ठेवून आपण दररोज कचरा विलगीकरणासह घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण व संगोपन, वाया गेलेल्या पाण्याचा पुनर्वापर तसेच जल पुनर्भरण (बोअरवेल रिचार्ज) असे उपक्रम आदर्श पद्धतीने राबवावेत. त्यानंतर या अभियानांतर्गत केलेल्या कार्याचा संपूर्ण अहवाल महापालिकेतर्फे केंद्र व राज्य सरकारकडे पाठविला जाऊन जळगाव शहर संपूर्णपणे कचरामुक्त होऊन केंद्र व राज्य सरकारचा पुरस्कार आपल्या महापालिकेस नक्कीच प्राप्त होईल, असे आवाहन यावेळी महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन यांनी केले.
तसेच ‘आमची कॉलनी कचरामुक्त आहे’ असे महापालिकेस कळविणार्या रहिवाशांचा त्या-त्या भागात जाऊन सन्मान करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू राहील. कुणीही रस्त्यावर कचरा न टाकता त्याचे विलगीकरण करून तो घंटागाडीतच टाकावा, असेही महपौर यांनी सांगितले.