जळगाव, (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यात जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण उपक्रमाला, विशेषतः वनराई बंधारे बांधण्याच्या कार्याला, मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या माध्यमातून सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी एकाच दिवसात जिल्हाभरात तब्बल ३८१ वनराई बंधाऱ्यांचे काम पूर्ण करण्यात आले.
याच उपक्रमांतर्गत, जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे सोमवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. जिल्हा सायकलिस्ट असोसिएशनचे सदस्य, तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग नोंदवला.
यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी ‘वनराई बंधाऱ्यांमुळे जलसंधारण, भूजल पातळीत वाढ, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता आणि पर्यावरण संवर्धन या सर्व घटकांमध्ये सकारात्मक बदल होतो. ग्रामीण भागातील लोकांनी अशा उपक्रमात सक्रिय सहभाग घेतल्यास जलसंपत्ती टिकविणे व सशक्त ग्रामविकास साध्य होऊ शकतो,’ असे मत व्यक्त केले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. अकलाडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विनोद चावरिया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राहुल जाधव यांच्यासह अनेक अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.