जळगाव, (प्रतिनिधी) : पंढरपूर आषाढी वारीसाठी खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश लाभले असून, दिनांक ४ जुलै २०२५ रोजी सुरू करण्यात आलेल्या उधना–पंढरपूर आषाढी स्पेशल रेल्वेचे स्वागत जळगाव लोकसभा क्षेत्रातील अमळनेर, धरणगाव, जळगाव, पाचोरा व चाळीसगाव या स्थानकांवर वारकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून पार पडले.
खा. स्मिता वाघ यांनी अमळनेरपासून या रेल्वेमध्ये स्वतः प्रवास करत भाविकांना शुभेच्छा दिल्या. पारंपरिक वाद्यांचा गजर, टाळ-मृदंगाच्या तालावर “जय हरी विठ्ठल” च्या घोषात हजारो वारकऱ्यांनी भक्तिपूर्ण वातावरणात रेल्वेचे स्वागत केले. अनेक ठिकाणी भजनी मंडळांच्या सादरीकरणाने रेल्वे स्थानके भक्तिमय बनली होती.
ही विशेष सेवा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने सुरू करण्यात आली आहे. वयोवृद्ध, महिला, लहान मुले आणि युवकांसाठीही हा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित व आरामदायक ठरतो आहे.