जळगाव, (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील कर्जाने आरोग्य उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात एका आदिवासी महिलेला भर रस्त्यावर प्रसूती करावी लागल्याच्या गंभीर घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्रीमती मिनल करनवाल यांनी आरोग्य यंत्रणेला धारेवर धरले आहे.
दि. ३० मे रोजी तातडीने बोलावलेल्या जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी ग्रामीण व आदिवासी भागांतील नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवा पुरवणे ही आरोग्य विभागाची प्राथमिक जबाबदारी असून, यात कोणतीही कुचराई सहन केली जाणार नाही, असे स्पष्टपणे बजावले.
सीईओंचे महत्त्वाचे निर्देश..
▪️आदिवासी भागांसाठी कृती आराखडा: विशेषतः गर्भवती व बाळंत महिलांसाठी प्रभावी आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
▪️औषध वाटप योजना मजबूत करणे: आवश्यक औषधे वेळेवर व नियमितपणे वितरीत होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
▪️रुग्णवाहिका सेवेत सुधारणा: प्रत्येक रुग्णवाहिकेत जीपीएस ट्रॅकर बसवण्याचे आदेश देण्यात आले, जेणेकरून त्यांचे मूव्हमेंट ट्रॅक करता येईल व आपत्कालीन प्रसंगी वेळेवर पोहोचता येईल.
▪️आरोग्य कर्मचाऱ्यांना जबाबदारीने वागण्याचा आग्रह: सेवाभाव, तत्परता व शिस्तबद्धता ही आरोग्य कर्मचाऱ्यांची ओळख ठरली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश श्रीमती करनवाल यांनी दिले.
या बैठकीला लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे कार्यक्रम अधिकारी हेमंत भदाणे यांच्यासह अनेक वरिष्ठ आरोग्य अधिकारी उपस्थित होते. यापुढे अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी एकजूटीनं आणि जबाबदारीने कार्य करण्याचे आश्वासन सर्वांनी दिले.
या बैठकीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने स्पष्ट संदेश दिला आहे की, ग्रामीण व विशेषतः आदिवासी भागातील आरोग्य सेवा ही प्राथमिकता असून, कोणत्याही प्रकारची हलगर्जी सहन केली जाणार नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या स्पष्ट नेतृत्व आणि तात्काळ कृतीमुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला एक नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.