जळगाव, (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील बिलवाडी येथे शेतात काम करताना अचानक पाऊस सुरु झाला. तेव्हा कोंबड्याना खाद्य टाकण्यास गेलेल्या शेतमजूर महिलेच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दि. ११ मे रोजी दुपारी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. ऐन मातृदिनाच्या दिवशीच महिलेची ५ मुले पोरकी झाली आहे. तर तहसीलदार व अधिकाऱ्यांनी सोमवारी घटनास्थळी जाऊन पाहणी करीत मयत महिलेच्या परिवाराला रुपये ४ लाख शासनाच्या वतीने मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
हिराबाई गजानन भिल (वय ३८, रा. बिलवाडी ता. जामनेर) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या पती, ४ मुली, १ मुलगा यांचेसह बिलवाडी येथील दिलीप हरी भावसार यांच्या शेतशिवारातील घरात राहत होत्या. दोन्ही पती-पत्नी शेतमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, रविवारी दुपारी ४ वाजता जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरु झाला होता. पोलीस पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतात घराजवळ एका झाडाखाली असलेल्या कोंबडीच्या पिल्लाना भर पावसात हिराबाई ह्या अन्न-पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी निंबाच्या झाडावर जोरदार वीज पडली व ती खाली असलेल्या हिराबाई यांच्या अंगावरच कोसळली.
या भयावह घटनेत हिराबाई यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना ग्रामस्थांनी पहूर येथील रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी महिलेच्या लहान मुलांनी तसेच कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. या घटनेमुळे बिलवाडी गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान घटनेबाबत पहूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी दि. १२ मे रोजी सकाळी तहसीलदार नानासाहेब आगळे, पहूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सचिन सानप, मंडळ अधिकारी व इतर अधिकारी यांनी घटनास्थळी पाहणी करून हिराबाई यांच्या परिवाराचे सांत्वन केले. तसेच शासनातर्फे ४ लाख रुपये मिळवून देण्याचे आश्वासन तहसीलदार आगळे यांनी हिराबाई भिल यांच्या परिवाराला दिले आहे.