जळगाव, (प्रतिनिधी) : भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) ह्या उपक्रमाने पुढील दहा वर्षांसाठीच्या मोठ्या विस्तार योजनांच्या नियोजनासह नुकतेच अकरावे वर्ष पूर्ण केले. २७ एप्रिल ते ४ मे २०२५ या कालावधीत फाली ११ अधिवेशनाचे आयोजन जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि., जैन हिल्स, जळगाव येथे करण्यात आले आहे. तीन टप्प्यात होणाऱ्या अधिवेशनामध्ये फालीचे १,१०० पेक्षा जास्त विद्यार्थी त्यांच्या ९० फाली कृषी शिक्षकांसह आणि फाली ११ ला सहकार्य करणाऱ्या अकरा कंपन्यांमधील ५० हून अधिक उच्चस्तरीय आणि वरिष्ठ व्यवस्थापकांसह सहभागी होत आहेत.
फाली ११ मध्ये सहभागी होणाऱ्या १७५ शाळांमधील हे फालीचे विद्यार्थी शालेय स्तरावरील व्यवसाय योजना आणि अॅग्रीटेक इनोव्हेशन स्पर्धांचे विजेते आहेत. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान ह्या कृषी क्षेत्रातील चार प्रमुख राज्यांमध्ये फाली सध्या कार्यरत आहे. पुढील दहा वर्षांत किमान आणखी तीन मोठ्या राज्यांमध्ये विस्तार करण्याची फालीची योजना आहे. यावर्षी, ग्रामीण भागातील सरकारी अनुदानित शाळांमधील ८ वी आणि ९ वीचे १५,००० पेक्षा जास्त फाली विद्यार्थ्यांनी कृषीशास्त्र, पशुधन शास्त्र, कृषी तंत्रज्ञान, ॲग्रो-एंटरप्राइज आणि ॲग्री-फायनान्स या विषयावरील परस्परसंवादी (इंटरअक्टीव) वर्गात भाग घेतला होता. सर्व मॉड्यूल्समध्ये हवामानातील बदलांना सामोरे जाण्याचे ज्ञान दिले जाते.
FALI चे विद्यार्थी शैक्षणिक वर्षात फाली कृषी शिक्षकांसोबत संवादात्मक सत्रांमधून प्रात्यक्षिकांमधून आणि प्रत्येक शाळेत असलेल्या शेडनेट मधून प्रशिक्षण देतात. ते आधुनिक शेतीसह अग्रगण्य कृषी-उद्योगांच्या ठिकाणी क्षेत्रीय भेटी देतात. वेबिनार आणि व्हिडिओंच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील अनुभवी वरिष्ठांसोबत संपर्क करून अत्याधुनिक नवकल्पना विषयी माहिती मिळवतात. व्यवसायाच्या नवीन योजना तयार करतात व आधुनिक कृषी तंत्रज्ञाना संबंधी संशोधन करतात.
फाली मधील ९०% पेक्षा जास्त विद्यार्थी आणि पालक असे म्हणतात की, “फाली ने कृषी आणि कृषी-उद्योगातील भविष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला आहे. विद्यार्थ्यांनी कृषी आणि कृषी उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक तांत्रिक, व्यवसायिक आणि नेतृत्त्व कौशल्ये फाली मध्ये प्राप्त केली आहेत. आधुनिक आणि शाश्वत शेतीमध्ये भविष्य घडविण्यासाठी फाली मधील अनेक विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी त्यांच्या कुटुंबाच्या शेतामध्ये सुधारित कृषी पद्धती आणि तंत्रज्ञान आणतात.” फाली मध्ये आता ४५,००० पेक्षा जास्त माजी विद्यार्थी आहेत आणि २०३२ पर्यंत ही संख्या २,५०,००० पर्यंत वाढविण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
फाली बद्दल मान्यवरांच्या प्रतिक्रिया..
जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन म्हणतात, ‘शेतकरी आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारे व्यवसाय निर्माण करण्यासाठी आम्हाला ग्रामीण आणि शहरी यामध्ये संपर्क साखळी निर्माण करावी लागेल.’
नादीर गोदरेज म्हणतात की, ‘फाली मधील तरुणांना शेती आणि शेती व्यवसाय हे त्यांच्या जीवनाचे कार्य म्हणून करण्यासाठी प्रोत्साहित करत राहिले पाहिजे. त्यासाठी आपण फाली माजी विद्यार्थी कार्यक्रम, विशेषत: इंटर्नशिप्स या पुढे ही सुरूच ठेवले पाहिजेत.’
यूपीएलचे अध्यक्ष रज्जू श्रॉफ म्हणतात की, ‘हे युवा नायक भारतीय शेतीतील उत्पादकता सुधारतील आणि हवामान बदलाच्या आव्हानांना योग्य रीतीने सामोरे जातील.’
नॅन्सी बॅरी म्हणतात की, ‘या तरुणांमध्ये धगधगती शक्ती आहे; आपण ती योग्य मार्गाने वापरात ठेवू या. यासाठी भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत २०३२ पर्यंत अडीच लाख फाली माजी विद्यार्थी तयार करणे ही एक खूपच लहान संख्या आहे. पण भारतीय शेतीचा कायापालट करणारे नायक म्हणून ही संख्या खूप मोठी आहे.’
तीन टप्प्यात फालीचे अधिवेशन..
जैन हिल्स ला फालीचे अकरावे अधिवेशन २७ एप्रिल पासून सुरू होईल. पहिल्या टप्प्यात २७ ते २८ एप्रिल दरम्यान होईल. दुसऱ्या टप्प्यात ३० एप्रिल ते १ मे, तिसरा ३ ते ४ मे दरम्यान फालीचे विद्यार्थी अॅग्री बिझनेस व इनोव्हेशन प्लॅन चे सादरीकरण करतील.