जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद गावाच्या पुढे उड्डाणपुलावर एका मालवाहू रिक्षाला अचानक आग लागल्याने ती आगीत जळून खाक झाली. यामुळे रिक्षाचालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्यात आली आहे.
सारंग रामदास माळी यांच्या मालकीचे (एमएच १९ सीडब्ल्यू २०७०) हे मालवाहू वाहन बायोमेडिकल वेस्टच्या कामाला वापरले जाते. हे वाहन जळगाव येथून दि. २२ मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास भुसावळ येथे जात होते. नशिराबाद गाव ओलांडल्यावर उड्डाणपुलावर अचानक रिक्षाला आग लागली. चालक सारंग माळी यांनी तत्काळ रिक्षा बाजूला लावून बाहेर निघाले. तोवर रिक्षाला लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले होते.
दरम्यान अग्निशमन दलाच्या वाहनाला पाचारण करण्यात आले. माहिती मिळताच नशिराबाद व भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. एका अग्निशमन दलाच्या बंबाच्या मदतीने हि आग आटोक्यात आणून रिक्षाची आग विझवण्यात आली.