जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील धामणगाव शिवारातील शेतात फवारणी करतांना विषबाधा झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना प्रौढ शेतकऱ्याचा उपचारादरम्यान गुरूवारी दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
किशोर अभिमन तायडे (वय ५२ रा. धामणगाव ता.जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई मिराबाई, पत्नी बेबाबाई, ललित आणि जयवंत ही दोन मुले, भाऊ राजू असा परिवार आहे. धामणगावात किशोर तायडे हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते.
सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ते शेतात पिकांवर फवारणी करत असतांना त्यांना विषबाधा झाली. या विषबाधामुळे त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना गुरूवारी ६ फेब्रुवारी रोजी त्यांची प्राणज्योत मालविली. यावेळी नातेवाईकांनी रूग्णालयात आक्रोश केला. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.