अमळनेर, (प्रतिनिधी) : अनेक दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर असलेल्या नायडू गॅंगला अखेर जेरबंद करण्यात अमळनेर रेल्वे पोलिसांना यश आले आहे. रेल्वेमध्ये चोऱ्या करण्यात नायडू गँगला पटाईत होती. दरम्यान अमळनेरच्या रेल्वे पोलिसांनी गॅंग मधील चार जणांना अटक केली असून त्यांना मध्यप्रदेश पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
दि.४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता मध्य रेल्वे च्या खंडवा, भुसावळ आणि जळगाव आरपीएफ कडून मोबाईलवर अमळनेरचे एएसआय कुलभूषणसिंग चौहान याना माहिती मिळाली होती की, खंडवा स्टेशनवर प्रवाश्यांचा सामान चोरी झाल्याची घटना घडली असून त्यात एक गँग सामील आहे आणि ते एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर कपडे बदलवून रूप बदलतात असे सीसीटीव्ही फुटेज देखील प्राप्त झाले असून खंडवा स्टेशनवर एफआयआर दाखल झाली आहे.
नंतर हे सराईत गुन्हेगार भुसावळ उधना गाडी क्रमांक १९१०६ मध्ये रवाना झाल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सत्यजित कुमार याना प्राप्त झाली. त्यांच्या मार्गदर्शनाने कुलभूषणसिंग यांनी अमळनेर चे कर्मचारी हेडकॉन्स्टेबल नंदू पाटील, अर्जुनसिंग याना अमळनेर स्टेशनवर मेमो गाडी आली असता गुन्हेगारांचा शोध घेण्यास सांगितले. तीन चार डबे तपासल्यावर सामान्य कोच मध्ये चार संशयित व्यक्ती आढळून आले. त्यांना पोलिसांनी घेराव घालून त्यांची उलट तपासणी सुरू केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी नायडू गॅंग चे सदस्य असल्याचे कबूल केले.
यात संशयित अविनाश महारनन्ना नायडू (वय २५), अजय महारनन्ना नायडू (वय २५), काली कुन्नईया नायडू (वय २९, तिघे रा वाकीपाडा मरीमाता मंदिर जवळ, नवापूर महाराष्ट्र) तर राजा आरमबम (वय ३३ रा. अमरनगर, उज्जैन, मध्यप्रदेश) अशा चार संशयतांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
नायडू गँग मध्ये सात ते आठ सदस्य असून त्यांनी रेल्वे मध्ये तसेच विविध शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्याच्याजवळून जप्त केलेल्या साहित्यात दोन लॅपटॉप, ६ मोबाईल, चार्जर, घड्याळ, ४६ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच दोन धारदार चाकू जप्त करण्यात आले आहेत. नायडू गँग चे सदस्य सापडल्याने मोठ्या चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.