जळगाव, (प्रतिनिधी) : राज्यभरात गुलेन बारे सिंड्रोम अर्थात जीबीएस आजाराचा पहिला रुग्ण जळगाव तालुक्यात आढळून आला आहे. विशेष म्हणजे कुठलीही “ट्रॅव्हल्स हिस्ट्री” नसताना मात्र एका ४५ वर्षीय महिलेला हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली उपचार सुरु आहेत.
जळगाव तालुक्यातील एका भागात रहिवासी असलेली ४५ वर्षीय महिलेला अशक्तपणा, अंगदुखी, खांदे दुखणे, पाठ दुखणे, अचानक चालण्यास-बसण्यास त्रास होणे अशी लक्षणे जाणवली. कुटुंबीयांनी तातडीने या महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. याबाबत औषधवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पाराजी बाचेवार यांनी माहिती दिली.
सदर महिला कुठल्याही गावाला गेली नव्हती. त्यामुळे तिला ट्रॅव्हल्स हिस्ट्री नाही. तसेच, राहत्या घरीच हि अशक्तपणाची लक्षणे जाणवायला लागली होती. त्यामुळे कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात आणल्यामुळे सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे. न्यूरॉलॉजिस्ट डॉ. गोपाल घोलप, डॉ.अभिजित पिल्लई यांच्या देखरेखीखाली रुग्णाच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली जात आहे, असे डॉ. बाचेवार यांनी सांगितले. आजारातील बहुतांश रुग्ण बरे होतात. राज्यात एकदम कमी रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. पाणी उकळून पिणे, स्वत:ची रोगप्रतिकारक्षमता वाढविणे तसेच स्वच्छ पाण्याचा आग्रह धरणे या उपाययोजना महत्त्वाच्या आहेत, असेही डॉ. बाचेवार म्हणाले.
▪️जीबीएस आजाराची सर्वसाधारण लक्षणे..
▪️अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी / लकवा.
▪️अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा कमजोरी.
▪️डायरिया (जास्त दिवसांचा)
▪️नागरिकांनी घ्यावयाची काळजी*
▪️पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. उदा. पाणी उकळून घेणे.
▪️अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.
▪️वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.
▪️शिजलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकत्रित न ठेवल्यासही संसर्ग टाळता येईल.