अमळनेर, (प्रतिनिधी) : येथील ऐतिहासिक व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थान येथे लागलेल्या भीषण आगीत मोठे नुकसान झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी दुर्घटनास्थळाला आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि नुकसानीचा आढावा घेतला.

याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी आणि उपस्थित नागरिकांशी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील भावुक झाले. ते म्हणाले, “संत सखाराम महाराज वाडी हे आपल्या सर्वांचेच अत्यंत पवित्र आणि मोठे श्रद्धास्थान आहे. येथे झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत जिल्हा व तालुका प्रशासनाला तात्काळ आणि युद्धपातळीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.”

पालकमंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले की, आगीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले असून, अहवाल प्राप्त होताच पुढील आवश्यक ती शासकीय मदत आणि पुनर्वसनाची कामे वेगाने सुरू करण्यात येतील. या पवित्र श्रद्धास्थानाचा वैभवशाली वारसा आणि वैभव पुन्हा पूर्ववत उभे राहील, असा ठाम विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. या पाहणी दौऱ्यादरम्यान नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर प्रशासकीय अधिकारी, संस्थानचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









