जळगाव, (प्रतिनिधी) : संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस पिकामध्ये पाण्याचा कार्यक्षम व शाश्वत वापर करण्याच्या उद्देशाने प्रायमार्क कापूस प्रकल्प अंतर्गत जळगाव येथील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये “ट्रेनिंग ऑफ ट्रेनर” कार्यक्रम उत्साहात पार पडला.या प्रशिक्षणात सेवा फॉउंडेशनच्या ४८ गावांतील शेतकरी महिलांना प्रशिक्षित करण्यात आले.
या प्रशिक्षित महिला पुढे कापूस उत्पादक शेतकर्यांना पाणी व्यवस्थापनाबाबत वैज्ञानिक मार्गदर्शन करणार आहेत. यंदा संभाव्य एल निनो परिस्थितीमुळे निर्माण होणार्या पाणीटंचाईचा विचार करून कापूस पिकासाठी पाण्याचे नियोजन, बचत आणि कार्यक्षम वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणामध्ये कापूस पिकासाठी एक सरी आड सिंचन पद्धतीचा अवलंब, माती व वनस्पती निर्देशकांच्या आधारे (सूर्यफूलाचे संकेत, पानांवरील सुकण्याची लक्षणे आदी) सिंचनाचे योग्य वेळापत्रक निश्चित करणे, ठिबक सिंचन व आच्छादन (मल्चिंग) यांचा संयुक्त वापर करून पाण्याची बचत करणे तसेच पुढील हंगामासाठी अतिरिक्त पावसाच्या पाण्याचे साठवण आणि जलसंधारणाचे महत्त्व यावर विशेष भर देण्यात आला.
या प्रशिक्षणासाठी डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील कृषी वनस्पतीशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक प्रा. निलेश भागवत सदार यांनी प्रमुख संसाधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत वैज्ञानिक पद्धतीने पाणी व्यवस्थापन केल्यास कापूस उत्पादन टिकवून ठेवण्यास, उत्पादन खर्च कमी करण्यास आणि उपलब्ध पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करण्यास मोठी मदत होईल, असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
कार्यक्रमास सेवा फाउंडेशनचे प्रतिनिधी, प्रशिक्षक तसेच विविध गावांतील शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील शेतकर्यांमध्ये हवामान बदलाशी सुसंगत शेती तंत्रज्ञानाचा प्रसार होऊन शाश्वत कापूस उत्पादनाला चालना मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.








