हेमंत पाटील, (विशेष लेख) : जळगाव जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षितिजावर आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व म्हणजे माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील. रावेर तालुक्यातील विवरे या छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या सुपुत्राने आज आपल्या सेवाभावी वृत्तीने संपूर्ण खान्देशच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा धावता आढावा..

डॉ. उल्हासदादा पाटील यांच्या जडणघडणीत त्यांच्या मातोश्री, स्वर्गीय गोदावरी वासुदेव पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. आई ‘हाडाची शिक्षिका’ असल्याने बालपणापासूनच त्यांच्यावर शिस्त आणि समाजसेवेचे संस्कार झाले. आईकडून मिळालेला हा शैक्षणिक आणि संस्कारांचा वारसा डॉ. पाटील यांनी केवळ जपला नाही, तर तो ‘गोदावरी फाउंडेशन’च्या माध्यमातून वटवृक्षासारखा विस्तारला आहे.
”आरोग्य सेवा हीच माझी ऊर्जा आणि शिक्षण सेवा हीच शक्ती” हे ब्रीदवाक्य डॉ. पाटील यांच्या जगण्याचे सूत्र बनले आहे. त्यांनी गोदावरी फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आरोग्याची गंगा पोहोचवली. सामान्यातील सामान्य माणसाला अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी त्यांनी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांचे जाळे विणले. केवळ आरोग्यच नव्हे, तर शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी क्रांती घडवली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जागतिक स्पर्धेत टिकून राहावे, यासाठी त्यांनी दर्जेदार शैक्षणिक संस्थांची पायाभरणी केली.
डॉ. उल्हासदादा पाटील यांची ओळख एक ‘जिज्ञासू’ व्यक्तिमत्व म्हणून आहे. राजकारण आणि समाजकारणापलीकडे जाऊन शेती, उद्योग, साहित्य, कला, विज्ञान, तंत्रज्ञान आणि क्रीडा अशा विविध विषयांची त्यांना सखोल जाण आहे. या क्षेत्रातील दिग्गजांशी त्यांचे थेट संबंध असून, नवनवीन माहिती घेऊन स्वतःला अपडेट ठेवण्याची त्यांची वृत्ती तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. कोणत्याही कामाचे सूक्ष्म नियोजन करणे आणि ते तडीस नेणे, ही त्यांची कामाची पद्धत आदर्श ठरली आहे.
माणसाची खरी परीक्षा संकटाच्या काळात होते. काही काळापूर्वी जेव्हा त्यांना गंभीर आजाराचा सामना करावा लागला, तेव्हा त्यांनी आपल्या ‘शुद्ध हेतू’ आणि ‘शुद्ध कर्माच्या’ बळावर साक्षात नियतीलाही मात दिली. मृत्यूच्या दारातून परत आल्यानंतर विश्रांती घेण्याऐवजी, ते अधिक जोमाने जनसेवेच्या कार्यात झोकून दिले. “परिस्थिती कितीही गोंधळाची असली तरी शांत राहून काम करावे,” हा त्यांचा सल्ला आजच्या पिढीसाठी महत्त्वाचा आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आजवर त्यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. खासदार म्हणून त्यांनी संसदेत मांडलेले प्रश्न असोत किंवा एक डॉक्टर म्हणून केलेली रुग्णसेवा असो, प्रत्येक भूमिकेत त्यांनी सामान्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे.
”शून्यातून विश्व निर्माण करणारा आणि हजारो हातांना काम देणारा हा लोकनेता खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा अभिमान आहे.” आज अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य लाभो, हीच सदिच्छा !







