जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १३ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीच्या (भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-रिपाई) अधिकृत उमेदवारांविरुद्ध शड्डू ठोकणाऱ्या बंडखोरांना पक्षाने कडक इशारा दिला असून, दोन दिवसांत माघार न घेतल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मतदारांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता केवळ अधिकृत उमेदवारांनाच मतदान करावे, असे आवाहन महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
प्रभाग १३ मधील चारही जागा जिंकण्यासाठी महायुतीने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. या प्रभागातील अधिकृत उमेदवारांची फळी खालीलप्रमाणे आहे:
१३-अ (भाजपा): नितीन प्रभाकर सपके (चिन्ह: कमळ)
१३-ब (भाजपा): सौ. सुरेखा नितीन तायडे (चिन्ह: कमळ)
१३-क (भाजपा): सौ. वैशाली अमित पाटील (बिनविरोध निवड)
१३-ड (राष्ट्रवादी काँग्रेस): प्रफुल्ल गुलाबराव देवकर (चिन्ह: घड्याळ)
बंडखोरांकडून मतदारांची दिशाभूल?
भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी अनेक इच्छुक होते. मात्र, पक्षाने अधिकृत नावे जाहीर केल्यानंतरही काही इच्छुकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा पवित्रा घेतला आहे. विशेष म्हणजे, हे बंडखोर उमेदवार स्वतःला ‘भाजपाचेच’ असल्याचे भासवून मतदारांची दिशाभूल करत असल्याचे महायुतीच्या निदर्शनास आले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत पक्षाने स्पष्ट केले आहे की, ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांनी तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा त्यांच्यावर पक्षातून हकालपट्टीची टांगती तलवार असेल.
विकासासाठी महायुतीला साथ द्या: दीपक सूर्यवंशी
शहराच्या आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ महायुतीचे अधिकृत उमेदवारच कटिबद्ध आहेत. “मतदारांनी अपक्ष उमेदवारांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नये. विकासकामांची गती कायम राखण्यासाठी कमळ आणि घड्याळ या अधिकृत चिन्हांवरच आपले बहुमोल मत देऊन महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे,” अशी विनंती दीपक सूर्यवंशी यांनी केली आहे.








