जळगाव, दि. 11 – मागील वर्षी कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे अनेकांना नातेवाईक व आप्तेष्ट गमवावे लागलेत. बहुतांश जणांचे संसार अर्ध्यावर मोडले. या आघातातून काही कुटुंबे सावरू लागली आहेत. नव्याने संसाराची उभारणी होत आहे. अशा फेरजुळणीत एक आदर्शवत गंधर्व विवाहविधी गुरूवारी भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे पार पडला.कोरोना संसर्गामुळे विवाहित कन्येला गमावणाऱ्या पालकांनी जावाई व दोन नातींचे कुटुंब पुन्हा फुलविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
भोरगांव लेवा पंचायतीचे कुलसचीव ॲड.संजय राणे यांचे थोरले बंधू मिलिंद मनोहर राणे (रा.अहमदाबाद) यांची कन्या सौ. कोमल हिचा विवाह अहमदाबाद येथील सुजीत दिलीप महाजन यांच्याशी झाला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गामुळे कोमल हिचे मे महिन्यात निधन झाले. स्व. कोमल व सुजीत यांना उर्वि व चार्वी अशा दोन मुली असून कोरोनाच्या आपत्तीने त्यांच्या संसाराला दृष्ट लागली.
स्व. कोमल हिच्या अकाली निधानानंतर जावाई आणि नातींचे कुटुंब अधुरे झाले. सुजीत यांचा संसार पुन्हा फुलविण्यासाठी ॲड. संजय राणे यांनी कुटुंबात पुढाकार घेत दिलीप महाजन व आजोबा एम. डी. राणे यांनीही हा विचार उचलून धरला. सुजीत हे सुद्धा तयार झाले.
ॲड. संजय राणे व कुटुंबियांनी सुजीत यांना मुलगा मानून त्यांचा दुसरा विवाह जुळवायला प्रयत्न सुरू केले. परिचितांमधून नशिराबाद (ता. जळगाव) येथील विनोद रोटे यांची कन्या लिनाचे स्थळ समोर आले. लिना घटस्फोटीता असून ती सुद्धा दुसऱ्या विवाहास तयार झाली. अखेर राणे-महाजन कुटुंबियांच्या संमतीने रितसर विवाह जुळणी करून सुजीत व लिनाचा गंधर्व विवाह करून लावून दिला. या विवाहाकडे आदर्शवत आणि अनुकरणीय पाऊल म्हणून पाहता येते. जुन्या परंपरा मोडून कुटुंब पुन्हा फुलविण्याचा राणे, महाजन व रोटे कुटुंबाचा हा प्रयत्न समाज परिवर्तनाचा नवा माईलस्टोन रोवणारा असुन समाजासमोर आदर्श घडविणारा आहे.