जळगाव, दि.११ – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि के.सी.ई. संस्थेचे मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवारंग युवक महोत्सवात जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. तर प्रताप महाविद्यालय, अमळनेरचा संघ उपविजेता ठरला. बुधवारी या महोत्सवाचा समारोप मोठ्या जल्लोषात झाला. या महोत्सवात ११८९ सहभागी विद्यार्थ्यांपैकी ४७५ विद्यार्थी व ७१३ विद्यार्थिंनींचा सहभाग होता.
दि.७ ते ११ ऑक्टोबर दरम्यान जळगाव येथील मू.जे. महाविद्यालयात युवारंग युवक महोत्सव झाला. बुधवारी सिने कलावंत सुरभी हांडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. सुरेश भोळे उपस्थित होते. यावेळी के.सी.ई. संस्थेचे पदाधिकारी ॲङ प्रविणचंद्र जंगले, ज्ञानदेव पाटील, भालचंद्र पाटील, प्राचार्य ए. आर. राणे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर व्यवस्थापन परिषद सदस्य नितीन झाल्टे, प्रा. एस. टी. भुकन, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. सुरेखा पालवे, डॉ. पवित्रा पाटील, सी.ए. रवींद्र पाटील तसेच विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, प्राचार्य स.ना. भारंबे, समन्वयक डॉ. जुगलकिशोर दुबे, डॉ. मनोज महाजन यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना सुरभि हांडे यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. विविध प्रश्नांना उत्तरे देतांना त्या म्हणाल्या की, आयुष्यात खुपदा संधी प्राप्त होत असते. नेमकी संधी कोणती हे कळायला हवे. स्वत:शी स्पर्धा करा. आज केलेल्या अभिनयापेक्षा अजून काय उत्तम करता येईल याचा मी विचार करत असते. लहान गावातून मुंबईत गेल्यानंतर करीअर करतांना पुन्हा गावाकडे परतायचे नाही हे डोक्यात ठेवा. स्पर्धेतील सहभागामुळे आत्मविश्वास वाढतो. सोशल मिडीयाचा फायदा तरूण पिढीला होत आहे. मी मूळजी जेठा महाविद्यालयात शिकत असतांना शिक्षकांकडून खूप काही शिकले. त्याच महाविद्यालयात माझे कौतुक होत आहे याचा खुप आनंद आहे असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. भाग्यश्री भलवतकर व प्रा. योगेश महाले यांनी केले तर समन्वयक प्रा. जुगलकिशोर दुबे यांनी आभार मानले.