जळगाव, दि.०८ – जैन इरिगेशनसाठी २०१९ ते २२ ही आर्थिक वर्षे व्यवसायाच्यादृष्टीने कसोटीची होती. ग्रीक संस्कृतीमधील ‘फिनिक्स’ जशी सूर्याकडे उंच भरारी घेतो व स्वत:च्या राखेतून अस्तित्व निर्माण करून पुन्हा उंच भरारी घेतो. त्याप्रमाणे जैन इरिगेशन सिस्टिम्स कंपनीने भरारी घेतलेली आहे. भविष्यातील काळ जैन इरिगेशनमधील प्रत्येक सहकारी, भागभांडवलदार, वितरक, हितचिंतक यांना आनंदाची वार्ता घेऊन येईल. असे आश्वासक प्रतिपादन जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष अनिल जैन यांनी केले.
जैन इरिगेशनच्या प्लास्टीक पार्क, बांभोरी येथील प्रशासकीय इमारतीसमोरील पटांगणावर झालेल्या ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थितांशी सुसंवाद साधत होते. यावेळी व्यासपीठावर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन, अतुल जैन, वरिष्ठ संचालक पद्मभुषण डॉ. डी. आर. मेहता, स्वतंत्र संचालक घनश्याम दास, स्टुॅच्युटोरी ऑडिटर नविंद्रकुमार सुराणा, सीएफओ बिपीन वलामे, कंपनी सचिव अवधुत घोडगावकर, जैन फार्मफ्रेश फुड्सचे संचालक अथांग जैन यांच्यासह ऑनलाईन पद्धतीने इतर संचालक मंडळ उपस्थित होते. ‘स्क्रुटीनिअर’ (प्रॅक्टीसींग कंपनी सेक्रेटरी) म्हणून मुंबईच्या अमृता नौटीयाल उपस्थित होत्या.
सर्वसाधारण सभेच्या आरंभी अध्यक्ष अशोक जैन यांनी गत वर्षात मृत्यू पावलेल्या व्यक्तींना आदरांजली वाहिली, व सभेसमोर कंपनीतील संचालक मंडळातील सदस्यांची नियुक्ती यासह नऊ ठराव मांडले.
आर्थिक शिस्त, कृषिक्षेत्रातील गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञान व शेतकऱ्यांबद्धल असलेली बांधिलकी यामुळेच कंपनीला वेगाने आर्थिक प्रगती साध्य करता आली. अल्पभुधारक शेतकऱ्याला आर्थिक भरभराटीत आणण्याचे मूल्याधिष्ठित ध्येय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंचे होते; तोच वारसा जपत जैन इरिगेशन मधील प्रत्येक सहकारी, भागभांडवलदार, वितरक, हितचिंतक कार्य करीत आहे. अॅग्रीकल्चर इनपुटचे तंत्रज्ञान पोहचत असताना पुढच्या पिढीचे भविष्य सुकर होण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य वापर करून विकास साधण्यासाठी कंपनीने आपल्या व्यवसायाचे दोन विभागात पुनर्गठन केले आहे. यात ‘सस्टेनेबल अॅग्रीटेक सोल्यूशन (SAS)’ आणि ‘पाईपिंग अॅण्ड बिल्डींग प्रोडक्ट सोल्यूशन (PBPS)’ यातून कंपनीला व्यवसायाच्या व्यापक संधी आहेत. यासह कंपनी आगामी काळात शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रभावी ठरणाऱ्या टिश्यूकल्चर रोपांमध्ये बटाटा, कॉफी, काळिमिरी, पपई, टॉमोटो यासह सात ते आठ नव्या पीकांच्या संशोधना संदर्भात कंपनीने लक्ष केंद्रित केले असल्याचे उपाध्यक्ष अनिल जैन म्हणाले.
यासह बास मोहरमन, राधिका परेरा, डॉ. एच. पी. सिंग आदी संचालकांनी आपल्या प्रतिक्रीया नोंदविल्यात. आभार अतुल जैन यांनी मानले. राष्ट्रगीताने कंपनीच्या सर्वसाधारण सभेचा समारोप झाला. यावेळी रायसोनी मॅनेजमेंट कॉलेज, अनुभूती निवासी स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.