जळगाव | प्रतिनिधी पतीच्या निधनानंतर एकट्या राहणाऱ्या आणि स्वतःची अपत्ये नसल्याने ज्या भाच्याला मुलाप्रमाणे मानले, त्याच भाच्याने दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्ध मावशीचा घात केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पारोळा तालुक्यातील करंजी येथील ८५ वर्षीय वैजयंती गणपत माळी यांच्या खूनप्रकरणाचा तब्बल ३५ दिवसांनी जळगाव पोलिसांनी छडा लावला आहे. संशयित प्रशांत उत्तम माळी याला पोलिसांनी १२ सप्टेंबर रोजी धुळे येथून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत खुनाची धक्कादायक माहिती समोर आली असून, १३ सप्टेंबर रोजी त्याच्या सांगण्यावरून शोध घेतला असता मानवी अवशेष आणि सांगाडा आढळून आला.

वैजयंती माळी या ३ ऑगस्ट २०२६ रोजी करंजी येथील घरातून बेपत्ता झाल्या होत्या. त्या एकट्याच राहत असल्याने त्यांच्या नातेवाइकांनी शोध सुरू केला. ९ ऑगस्ट रोजी पारोळा पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३८(२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, वैजयंती माळी यांचा सख्ख्या बहिणीचा मुलगा प्रशांत उत्तम माळी हादेखील घटनेनंतर अचानक गायब झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याच्या हालचालींवर पोलिसांचा संशय बळावला.

वैजयंती माळी यांना स्वतःची अपत्ये नसल्याने त्या प्रशांतला मुलाप्रमाणे मानत होत्या. त्या वेळोवेळी त्याला आर्थिक मदतही करीत असल्याचे तपासात समोर आले. मात्र, प्रशांतवर एचडीएफसीचे कर्ज तसेच इतर उधारी असल्याने त्याची नजर वैजयंती यांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांवर असल्याचा संशय तपासातून पुढे आला.
पोलिसांनी करंजी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. ३ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे सहा वाजता प्रशांत हा करंजी गावात आल्याचे फुटेजमधून स्पष्ट झाले. त्याचप्रमाणे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वैजयंती माळी घाईघाईने जाताना आणि त्यानंतर एका कारमध्ये बसताना दिसून आल्या. या फुटेजमुळे तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली.
यानंतर पोलिसांनी प्रशांतचा कसून शोध सुरू केला. तब्बल ३५ दिवस तो पोलिसांना गुंगारा देत फरार होता. मात्र, जळगाव पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा ठावठिकाणा शोधून काढला आणि १२ सप्टेंबर रोजी धुळे येथून त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांच्या चौकशीत प्रशांतने वैजयंती माळी यांना खोटे कारण सांगून सोबत नेल्याचे समोर आले. आपल्या साडूच्या वडिलांचे निधन झाले असून, अंत्यविधीसाठी शिरसोली येथे जायचे असल्याचे सांगत त्याने वैजयंती यांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर त्याने वैजयंती यांच्याकडे दागिन्यांची मागणी केली. त्यातून दोघांमध्ये झटापट झाली. याचदरम्यान वैजयंती निपचित पडल्या. त्यानंतर प्रशांतने मुकटी, धुळे परिसरापासून सुमारे सात ते आठ किलोमीटर अंतरावर त्यांचा कापडाने गळा आवळून खून केल्याची माहिती तपासात समोर आली.
खून केल्यानंतर प्रशांतने वैजयंती यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले. रात्रीच्या वेळी मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवून तो मुकटी येथील घरी गेला आणि तेथे झोपला. दुसऱ्या दिवशी दिवसभर मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावायची, यासाठी तो फिरत राहिला. याचदरम्यान त्याने दुपारी एका सोनाराकडे दागिने विकल्याची माहितीही तपासात समोर आली.
त्यानंतर रात्री त्याने कार घेऊन बायपास महामार्गावरील ड्रेनेज पट्ट्यातील सिमेंटच्या गॅपमध्ये मृतदेह टाकून दिल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.
१३ सप्टेंबर रोजी पोलिसांनी संशयित प्रशांत माळी याने दिलेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी शोधमोहीम राबवली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात कुजलेले मानवी अवशेष आणि सांगाडा आढळून आला. त्यामुळे वैजयंती माळी यांच्या बेपत्ता होण्याचे गूढ उकलण्यास महत्त्वाची मदत झाली आहे.
मानवी गुप्तवार्ता, सीसीटीव्ही फुटेज, सातत्यपूर्ण तपास, कौशल्यपूर्ण तपासपद्धती आणि गोपनीय माहितीच्या आधारे जळगाव पोलिसांनी तब्बल ३५ दिवसांनंतर या गंभीर गुन्ह्याचा छडा लावला. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.








