जळगाव, (प्रतिनिधी) : सकल ब्राह्मण समाजाच्या एकजुटीचे प्रतीक असलेला भगवान श्री परशुराम जन्मोत्सव यंदा जळगावात सलग १७ व्या वर्षी अत्यंत उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत आहे. या महोत्सवांतर्गत येत्या रविवार, १२ एप्रिल रोजी विराट मोटारसायकल रॅली आणि रविवार, १९ एप्रिल रोजी मुख्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. “प्रत्येकाने स्वतः परशुराम दूत बनून या सोहळ्यात सहभागी व्हावे,” असे आवाहन बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष ॲड. ओम त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत केले.
नवी पेठ येथील हनुमान मंदिरात आयोजित या पत्रकार परिषदेला संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड, माजी अध्यक्ष नितीन पारगावकर, सहसचिव पंकज पवनीकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
जन्मोत्सवाच्या मुख्य सोहळ्यापूर्वी वातावरण निर्मितीसाठी १२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता महाबळ चौकातून दुचाकी रॅली निघणार आहे. ही रॅली काव्यरत्नावली चौक, रिंगरोड, शास्त्री टाॅवर, सुभाष चौक, पांडे डेअरी चौक आणि सावरकर पुतळ्यामार्गे पोलीस मल्टीपरपज हॉल येथे पोहोचेल. याठिकाणी सायं. ७ वाजता दानदाते व श्रमदाते गौरव सोहळा संपन्न होईल.
१९ एप्रिलला मुख्य जन्मोत्सव सोहळा..
ब्राह्मण एकता दिवसाचा मुख्य कार्यक्रम १९ एप्रिल रोजी होणार असून सकाळी ९.०० वाजता ग्रामदैवत श्रीराम मंदिरात परशुराम पूजन करण्यात येईल. त्यानंतर दुपारी ४.३० वाजता सुभाष चौकातून भव्य शोभायात्रेला प्रारंभ होईल. या शोभायात्रेत भगवान परशुरामांचा भव्य रथ, ढोल-ताशा पथक, लेझीम आणि दांडिया पथकांचा समावेश असेल. विशेष म्हणजे महिलांचे तलवारबाजी आणि दांडपट्टा प्रात्यक्षिके यंदाचे मुख्य आकर्षण राहणार असून, हनुमान जयंतीपासूनच याचा सराव सुरू झाला आहे. शोभायात्रेचा समारोप शिवतीर्थावर होईल.
नाविन्यपूर्ण उपक्रम: २८ पानी दिनदर्शिका..
यंदा निमंत्रण पत्रिकेऐवजी संस्थेतर्फे २८ पानी मराठी नववर्ष दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. यात ब्राह्मणांच्या मूळ कुळपुरुषांची माहिती, शास्त्रशुद्ध तिथी आणि समाजोपयोगी माहिती देण्यात आली आहे. समाजात ऐक्य निर्माण व्हावे, हा यामागील उद्देश असल्याचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड यांनी सांगितले. ज्या कुटुंबांपर्यंत ही दिनदर्शिका पोहोचली नसेल, त्यांना ती शिवतीर्थावर उपलब्ध करून दिली जाईल.

वर्षभर व्याख्यानमालेचे आयोजन..
केवळ शोभायात्राच नव्हे, तर वर्षभर छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह व गंधे सभागृहात विविध व्याख्याने आणि स्नेहसंमेलनांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
या पत्रकार परिषदेला माजी अध्यक्ष सुरेंद्र मिश्रा, राजेश नाईक, शिव शर्मा, गोपाळ पंडित, महिला संघाच्या संस्थापक अध्यक्षा सुधा खटोड, नूतन अध्यक्षा पूनम तिवारी, सचिव मानसी जोशी, प्रसिद्धी प्रमुख मनीष पात्रीकर आदी उपस्थित होते. ४०० हून अधिक स्वयंसेवक या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.







