मुक्ताईनगर, (प्रतिनिधी) : येथील योगमाया प्रतिष्ठान या नोंदणीकृत सामाजिक संस्थेच्या वतीने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. “लेखन संस्कृती जपत शिवविचारांचा जागर” या संकल्पनेतून पार पडलेल्या या स्पर्धेत शहरातील ४०५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाला शब्दांकित केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांनी केलेला संघर्ष, स्वराज्याची निर्मिती आणि त्यांचे लोककल्याणकारी नेतृत्व या पैलूंचा विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास व चिंतन करावे, या मुख्य हेतूने ही स्पर्धा घेण्यात आली. मुक्ताईनगर शहरातील एकूण सहा परीक्षा केंद्रांवर ही स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. प्रत्येक केंद्रावर महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.
तीन गटांत रंगली स्पर्धा..
ही स्पर्धा एकूण तीन वयोगटांत विभागण्यात आली होती:
प्रथम गट (इयत्ता ५ वी ते ८ वी): या गटात सर्वाधिक ३२१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ‘शिवराय माझे आवडते राजे’, ‘जिजाऊंचे संस्कार’ आणि ‘गड-किल्ले संवर्धन’ या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले.
द्वितीय गट (इयत्ता ९ वी ते १२ वी): या गटातील ६३ विद्यार्थ्यांनी ‘शिवराय आणि पर्यावरण’, ‘भारतीय नौदलाचे जनक’ व ‘आजच्या काळातील शिवविचारांची गरज’ यांसारख्या गंभीर विषयांवर लेखन केले.
तृतीय गट (वरिष्ठ महाविद्यालय): महाविद्यालयीन २९ विद्यार्थ्यांनी ‘स्वराज्य ते सुराज्य प्रवास’, ‘सर्वसमावेशक राजा’ आणि ‘लष्करी व्यवस्थापन व गनिमी कावा’ या विषयांवर तात्विक मांडणी केली.
एकूण ४०५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेऊन आपली लेखन कौशल्ये सादर केली. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगमाया प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विन सुरवाडे यांच्यासह संकेत कपले, मयूर पाटील, सनत जैन, प्रवीण राठोड, मनीष महाजन, तेजस सापधरे, वैभव इंगळे, रूपेश कोळी, विश्वजित देशमुख आणि अनिल गवते आदी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन आणि लेखन संस्कृती जोपासली जात असून, शिवरायांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहचण्यास मदत होत असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले आहे.








