जळगाव, (प्रतिनिधी) : शहराला प्लास्टिकच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने आता निर्णायक पाऊल उचलले आहे. महापौर दीपमाला काळे यांनी शहरातील प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत प्लास्टिक विक्री पूर्णपणे थांबविण्याचा ‘अल्टिमेटम’ दिला असून, त्यानंतरही प्लास्टिक आढळल्यास २५ हजार रुपयांचा दंड आणि थेट गुन्हे दाखल करण्याचा कडक इशारा दिला आहे. सोमवारी, १६ फेब्रुवारी रोजी महापौर दालनात आयोजित प्लास्टिक विक्रेत्यांच्या तातडीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उपमहापौर मनोज चौधरी, महापालिका प्रशासन आणि प्लास्टिक विक्रेता असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रशासनाचा ‘प्लॅन ऑफ ॲक्शन’:
१ मार्चपर्यंत व्यापाऱ्यांनी आपला प्लास्टिक साठा हटवणे बंधनकारक आहे. मुदतीनंतर प्लास्टिक आढळल्यास पहिल्याच वेळी २५ हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. दंडासोबतच गरज पडल्यास संबंधित विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. पहिल्या टप्प्यात ‘सिंगल युज प्लास्टिक’ (कॅरिबॅग) पूर्णपणे बंद करण्यावर भर दिला जाणार आहे.
आरोग्य आणि पर्यावरणाचे रक्षण..
यावेळी बोलताना उपमहापौर मनोज चौधरी यांनी प्लास्टिकच्या दुष्परिणामांवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “प्लास्टिकमुळे कॅन्सर, दमा यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असून मुक्या जनावरांच्या (गाईंच्या) पोटात प्लास्टिक आढळत आहे. हे चित्र बदलण्यासाठी आता कडक पावले उचलणे गरजेचे आहे.”
महापौर दीपमाला काळे यांनी प्लास्टिकला पर्याय म्हणून कंपोस्टेबल बॅग्स आणि कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, कापडी पिशव्यांची मागणी वाढल्यास महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. १५ मार्च रोजी या मोहिमेचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे.
“जळगावच्या भविष्यातील हितासाठी लोकांची प्लास्टिक वापरण्याची सवय मोडावीच लागेल. ही शेवटची सामंजस्यपूर्वक सूचना आहे, यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता थेट ‘कडक’ कारवाई केली जाईल.”
– दीपमाला काळे, महापौर
नागरिकांसाठी आवाहन:
शहरात कुठेही प्लास्टिकची विक्री होत असल्यास नागरिक थेट महापौर किंवा उपमहापौरांकडे तक्रार करू शकतात.








