जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील प्रेमनगर भागात शनिवारी (३० जानेवारी) रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. आपल्या पतीसह पायी घरी परतत असलेल्या निर्मला जनार्दन चौधरी (वय ६८, रा. प्रेमनगर) यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निर्मला चौधरी आणि त्यांचे पती जनार्दन चौधरी हे नुकतेच नाशिक येथून जळगावला परतले होते. शहरात आल्यानंतर ते आपल्या नातेवाइकांकडे (भावाकडे) जेवणासाठी गेले होते. रात्री जेवण आटोपून दोघे पती-पत्नी पायी चालत आपल्या घराकडे जात असताना, पाठीमागून एका दुचाकीवर दोन तरुण आले. काही समजण्याच्या आतच, दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने निर्मला यांच्या गळ्यातील सोन्याच्या पोतीवर झडप घातली आणि ९० हजार रुपये किमतीचा ऐवज घेऊन दोन्ही चोरटे वेगाने पसार झाले.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे चौधरी दांपत्य सुन्न झाले. त्यांनी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत चोरटे दृष्टीआड झाले होते.









