जळगाव, दि.29 – भारत सरकार यांच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि रक्षा मंत्रालयातर्फे स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून ‘वंदे भारतम्-नृत्य उत्सव’ ही राष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या विद्यार्थी कलावंतांची निवड झाली. निवड झालेल्या कलावंताना राजपथाव प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या सांस्कृतिक पथसंचलनात स्वप्रतिभेचा आविष्कार सादर करण्याची संधी प्राप्त होणार आहे.
८५० संघामधून नॅशनल ग्रॅण्ड फिनालेसाठी ६५ संघ सहभागी झाले. यातून राजपथावरील पथसंचलनासाठी भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या संघाची निवड करण्यात आली. निवडीबाबतचे प्रमाणपत्र सांस्कृतिक आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री श्रीमती मीनाक्षी लेखी, रक्षा आणि पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती इला अरुण, शिबानी कश्यप, प्रतिभा प्रल्हाद, शोभना नारायण यांच्यासह परीक्षक गीतांजली लाल, मैत्रेयी पहारी, संतोष नायर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.
अभिमानास्पद बाब म्हणजे, भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या संघाने निवड समितीच्या सर्व चाचण्या पार करीत परिश्रम आणि कला-कौशल्य नैपुण्यासह स्पर्धांमध्ये क्रमाक्रमाने यश प्राप्त केले. दि.२६ जानेवारी २०२२ रोजी, प्रजासत्ताकदिनी दिल्लीत नव्याने तयार होणाऱ्या सुशोभित जनपथावर सांस्कृतिक पथसंचलनात नृत्य सादर करण्याची संधी या निवडलेल्या संघांना प्राप्त झाली आहे. भारतातील तज्ज्ञ कोरिओग्राफर्सकडून निवड झालेल्या नृत्य संघातील सर्व कलावंतांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. सोनल मानसिंग, शोभना नारायण, शिबानी काश्यप, ईला अरूण, प्रतिभा प्रल्हाद, गीतांजली लाल, संतोष नायर, मैत्रेयी पहारी यांनी काम पाहिले.
——————————————————
श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी ‘जे जे उत्तम-उदात्त-उन्नत म्हणती ते ते शाेधत रहावे या जगती!’ या व्यापक विचारांसह समाजातील गुणवत्तेकडे पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘राष्ट्रीय एकात्मता आणि कला संपदेचा उत्कृष्ट आविष्कार’ यांचा सुरेख समन्वय असलेला ‘वंदे भारतम्’ उपक्रम आयोजित केला होता. प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या सांस्कृतिक पथसंचलनात कान्हदेशातील भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या पथकाची निवड झाली आहे, ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे. ‘चांगलं पेराल तर चांगलच उगवतं!’ वाडवडिलांनी सांगितलेल्या संस्कारांचीच ही फलश्रुती! कलावंतांना स्वप्रतिभेचा आविष्कार सादर करण्याची संधी प्राप्त होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे हृदयापासून अभिनंदन.
–अशोक जैन, अध्यक्ष, भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन