जळगाव, (प्रतिनिधी) : एकाच कंपनीत काम करणाऱ्या मित्रांमध्ये झालेल्या जुन्या वादाचे पर्यावसान भीषण हत्यांकाडात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ भांडणाचा राग मनात धरून दोघांनी एका मित्राचा गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून नेव्हरे धरणात फेकून दिला. जामनेर येथील निलेश राजेंद्र कासार (वय ३०) असे मयत तरुणाचे नाव असून, जळगाव एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?..
मयत निलेश कासार हा जळगाव येथील ‘एलटीआय फायनान्स’ कंपनीत कामाला होता. याच कंपनीत त्याचा मित्र दिनेश चौधरी (वय २०, रा. तळई, ह.मु. शिरसोली) हा देखील कार्यरत आहे, तर भूषण बाळू पाटील (वय २०, रा. पिंपरी, ह.मु. शिरसोली) हा पूर्वी तिथेच कामाला होता. काही महिन्यांपूर्वी निलेश आणि भूषण यांच्यात किरकोळ कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. भूषणने हा राग मनात धरला होता. सोमवार, १५ डिसेंबर रोजी फायनान्सच्या एका प्रकरणाच्या मंजुरीवर चर्चा करण्याच्या बहाण्याने भूषण आणि दिनेश यांनी निलेशला शिरसोली येथे बोलावले. तिथे चर्चा सुरू असताना पुन्हा वाद झाला आणि संतापलेल्या भूषण व दिनेशने दोरीने निलेशचा गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह पोत्यात बांधून नेव्हरे धरणाच्या पाण्यात फेकून दिला.
असा लागला छडा..
निलेश घरी न परतल्याने नातेवाईकांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. तपासादरम्यान पोलिसांना निलेशची दुचाकी रामदेववाडी शिवारात बेवारस स्थितीत आढळली. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांनी तांत्रिक तपासाची चक्रे फिरवली. निलेशच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले असता, त्याचे शेवटचे बोलणे दिनेश आणि भूषणशी झाल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्यांनी खुनाची कबुली दिली.
धरणात शोधमोहीम..
संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (१९ डिसेंबर) सकाळी पोलिसांनी नेव्हरे धरण गाठले. तिथे शोधमोहीम राबवून निलेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक निरीक्षक अनिल वाघ यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मनमिळाऊ स्वभावाच्या निलेशचा अशा प्रकारे अंत झाल्याने जामनेर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, जिल्हा रुग्णालयात त्याच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.








