जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी आणि वाढत्या सेवनावर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. ८ किलो १३० ग्रॅम गांजा आणि इतर मुद्देमालासह दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांना मोठा धक्का बसला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोहवा रवींद्र अभिमन पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, दोन व्यक्ती काळ्या रंगाच्या बजाज पल्सर मोटरसायकलवरून (एम. एच.१८-बी. डब्ल्यू ८०३५) गलंगी गावाकडून चोपडा शहराकडे बेकायदेशीरपणे गांजाची वाहतूक करत आहेत. या माहितीच्या आधारे पोहवा विष्णू बिऱ्हाडे, रवींद्र पाटील आणि दीपक माळी यांनी गलंगी गावात पाळत ठेवली. आरोपींना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी चोपडा शहराकडे भरधाव वेगाने दुचाकी दामटली.
पाठलाग करणाऱ्या पोलीस पथकाने ही माहिती पोउपनिरी जितेंद्र वल्टे यांना दिली. पोउपनिरी जितेंद्र वल्टे यांनी विलेश सोनवणे आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने चोपडा शहरात नाकाबंदी केली. आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करत असताना मोटरसायकलवर मागे बसलेला एक व्यक्ती उडी मारून पळून गेला. पोउपनिरी जितेंद्र वल्टे यांनी सुमारे १५० ते २०० मीटर धावत पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. उदयभान संजय पाटील (वय २१ रा.चांग्या), योगेश रामचंद्र महाजन (वय २१ वर्ष) दोन्ही रा. अडावद ता. चोपडा यांना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत ९०,०००/- रुपये किमतीची एक बजाज पल्सर मोटरसायकल, १,२१,९५०/- रुपये किमतीचा ८.१३० किलोग्रॅम वजनाचा गांजा आणि ५१,०००/- रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण २,६२,९५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चोपडा शहर पोलीस स्टेशन करत आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव), पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे (चोपडा शहर पोलीस स्टेशन), पोउपनिरी जितेंद्र वल्टे, पोहवा विष्णू बिऱ्हाडे, रवी पाटील, दीपक माळी, विलेश सोनवणे, चालक दीपक चौधरी (सर्व स्थानिक गुन्हे शाखा जळगाव) तसेच पोकों मदन पावरा, महेंद्र पाटील, अतुल मोरे (चोपडा शहर पोलीस स्टेशन) यांच्या पथकाने केली.