जळगाव, (प्रतिनिधी) : एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत विषारी रसायनाच्या संपर्कात आल्याने २७ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विश्वनाथ शांताराम सोनवणे (वय २७, रा. कुसुंबा, ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे कुसुंबा गावावर आणि सोनवणे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ सोनवणे हा २७ जून रोजी एमआयडीसीतील एका कंपनीत कामावर असताना, तो अचानक एका घातक व विषारी द्रव्याच्या (केमिकल) संपर्कात आला. यामुळे त्याला तीव्र विषबाधा झाली. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने रात्री १० वाजता जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
विश्वनाथवर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यानच मंगळवार, १ जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार सचिन पाटील हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. कंपनीतील सुरक्षा उपाययोजना आणि या घटनेचे नेमके कारण याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.