जळगाव, (प्रतिनिधी) : लाखो वारकऱ्यांच्या पंढरपूर वारीतील प्रवासाला आता अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित स्वरूप मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाने ‘उधना-पंढरपूर स्पेशल ट्रेन’ला अधिकृत मंजुरी दिली असून, खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. यामुळे खान्देश आणि दक्षिण गुजरातमधील हजारो वारकऱ्यांचा पंढरपूरपर्यंतचा प्रवास सुकर होणार आहे.
पंढरपूरची वारी ही श्रद्धेची एक चालती परंपरा आहे, जिथे लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करत पायी चालत विठुरायाच्या दर्शनासाठी निघतात. या पवित्र यात्रेत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी, सुरक्षित प्रवासासाठी आणि वेळेची बचत होण्यासाठी खासदार स्मिता वाघ यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नांनी आता मूर्त रूप घेतले आहे.
विशेष गाडीची माहिती:
गाडी क्र. 09079/09080: ४ जुलै २०२५ रोजी धावणार.
गाडी क्र. 09081/09082: ५ जुलै २०२५ रोजी धावणार.
पंढरपूरहून परतीचा प्रवास: ५ व ६ जुलै २०२५ रोजी.
मार्ग: उधना – नंदुरबार – अमळनेर – धरणगाव – जळगाव – मनमाड – पंढरपूर.
खासदार स्मिता वाघ यांनी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्यासोबतच पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक यांच्याशी वेळोवेळी चर्चा करून ही मागणी प्रभावीपणे मांडली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना केंद्र सरकारने त्वरित मान्यता दिली. ही विशेष रेल्वे केवळ प्रवासाचे साधन नसून, भाविकांच्या मनातील विठ्ठल भेटीचा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. विशेषतः वयोवृद्ध, महिला, लहान मुले आणि युवकांसाठी हा प्रवास आता अधिक सुरक्षित, सुलभ आणि सन्माननीय ठरेल.
या यशाबद्दल बोलताना खासदार स्मिता वाघ म्हणाल्या, “वारी म्हणजे चालणं नव्हे, ती श्रद्धेची, भक्तीची आणि संस्कृतीची ओळख आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी हजारो वारकरी जीव ओतून मार्गस्थ होतात. त्यांच्या सेवेसाठी ‘उधना-पंढरपूर’ स्पेशल ट्रेन मिळवणं हे माझं कर्तव्यच होतं. ही ट्रेन म्हणजे भाविकांसाठी विठुरायाचं एक वरदानच ठरेल.” या मंजुरीमुळे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.