जळगाव, (प्रतिनिधी) : येथील भरारी फाउंडेशन व क्रेडाई जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ एप्रिल ते २० जून या दोन महिन्याच्या दरम्यान राबविण्यात येणाऱ्या भूजल पुनर्भरण अभियानाच्या १२ व्या वर्षाला प्रारंभ झाला आहे. रविवारी चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी आ. सुरेश भोळे, अनिश शहा, डॉ.पी आर चौधरी, धनंजय जकातदार, अनिल कांकरिया, रवींद्र लढ्ढा, दिपक सराफ, आदर्श कोठारी, चित्रा चौधरी, सपन झुनझुनवाला, अनिल भोकरे, अमर कुकरेजा, विजय वाणी, सेवानिवृत्त सहायक वनसंरक्षक एस आर पाटील, प्रविण पाटील उपस्थित होते.
पावसाळ्यात छताचे पाणी जमिनीत सोडण्याचे नियोजन (रेन वॉटर हार्वेस्टिंग) याबाबतच्या माहितीचा चित्ररथ शहरात विविध ठिकाणी फिरुन रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन, शहरातील नागरिकांना करण्यात येणार आहे. भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाळ्याच्या पाण्याचा विनियोग या विषयावर दोन महिने जनजागृती करणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, पावसाळ्याच्या पाण्याचा विनियोग या विषयावर लघू चित्रपट स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य यांसारखे कार्यक्रम होणार आहेत.
शहरातील सर्व मोकळ्या पटांगणात शोष खड्डे तयार करून त्यात पावसाचे पाणी जमिनीत मुरावे यासाठी लागणाऱ्या गोष्टींसाठी त्यांच्यातर्फे सर्वोतपरी सहकार्य होईल,असे आश्वासन आ.सुरेश भोळे यांनी दिले. तसेच क्रेडाईचे अनिश शहा यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्व नवीन बांधकामांना भूजल पुनर्भरण यंत्रणा बसविण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करू असे सांगितले.
दरम्यान या अभियानांतर्गत भूजल पुनर्भरण यंत्रणा बसविल्या, अशा शहरातील दहा नागरिकांचा जलरत्न सन्मान करण्यात आला. यात रवींद्र लढ्ढा, नरेंद्र चौधरी, लखीचंद जैन, जितेंद्र चौहान, प्रदीप अहिरराव, शंतनू चौधरी, मनीषा पाटील, शुभश्री दप्तरी, निलेश झोपे, रोहिणी देशमुख यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अक्षय सोनवणे, सागर पगारीया, निर्णय चौधरी, सागर परदेशी, निलेश पाटील, रोहिणी मोरडिया यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक दीपक परदेशी तर आभार दिपक सराफ यांनी मानले.