जळगाव, (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यात कुरंगी येथे शेतशिवारात विहिरीजवळ गेलेल्या तरुणाचा पाय घसरून पडल्याने विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दि. ४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भूषण आनंदा पाटील (वय ३२, रा. कुरंगी ता. पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो कुरंगी गावात आई, वडील, पत्नी, १ मुलगी यांचेसह राहत होता. शेतीकाम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, रविवारी भूषण पाटील हे त्यांच्या शेतात गेले होते. तेथे विहिरीजवळ काम करीत असताना पाय घसरून पाण्यात पडले व बुडून त्यांचा मृत्यू झाला.
आजूबाजूच्या ग्रामस्थांना कळताच त्यांनी भूषणला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून भूषण पाटील यांना मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेमुळे कुरंगी गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची पाचोरा पोलीस स्टेशनला नोंद घेण्यात आली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.