जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील भोकर येथे एका कर्जबाजारी शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि. ३१ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघड झाली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लीलाधर जयराम पाटील (वय ५०, रा. भोकर ता. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते पत्नी, मुलगा, सून, मुलगी यांच्यासह गावात राहत होते. शेतीकाम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, सोमवारी दि. ३१ मार्च रोजी दुपारी ते घरी एकटेच होते. त्यावेळी त्यांनी छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. कुटुंबियांना लक्षात आल्यावर त्यांनी लीलाधर पाटील यांना जळगाव येथे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.
यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मयत लीलाधर पाटील यांच्यावर कर्ज असल्यामुळे ते कसे फेडायचे या विवंचनेत ते होते. याच कारणातून नैराश्य येऊन त्यांनी आत्महत्या केली असावी अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. याप्रकरणी भोकर गावात शोककळा पसरली आहे. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.