जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील धानवड परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होऊन वीज कोसळून पंधरा वर्षे वयाच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे आजोबा हे भाजले जाऊन गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अंकुश विलास राठोड (वय १५, रा. धानवड, ता. जळगाव) असे मयत बालकाचे नाव आहे. अंकुश राठोड हा मुलगा आजोबा शिवाजी जगराम राठोड (वय ६५) यांच्यासह नेहमीप्रमाणे शेतात पिकांची राखण करण्यासाठी गेला होता. सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक विजांसह अवकाळी पाऊस सुरू झाला. त्यावेळी धानवड ते भवानी खोरा रस्त्यावर असलेल्या शेतात वीज कोसळून अंकुश राठोड या मुलाचा मृत्यू झाला तर आजोबा शिवाजी राठोड हे भाजले गेले.
ही घटना आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी राठोड यांच्या कुटुंबियांना माहिती दिली. त्यावेळी गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच अंकुशचा मृत्यू झाला होता तर गंभीर शिवाजी राठोड यांच्यावर उपचार सुरू आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान या घटनेमुळे धानवड गावावर शोककळा पसरली आहे.








