किरण चौधरी | जामनेर, (प्रतिनिधी) : संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचेकडील आदेशान्वये राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने दिवाणी व फौजदारी न्यायालय, क. स्तर जामनेर येथे आयोजित लोकन्यायालय मोठ्या उत्साहात पार पडले. या लोकन्यायालयात न्यायालयीन प्रलंबित प्रकरणात एकूण १०९ प्रकरणे निकाली निघाली. तर, वादपूर्व प्रकरणातील एकूण १३१८ प्रकरणे ही निकाली निघाली. अशी जामनेर न्यायालयातून एकत्र १४२७ प्रकरणे निकाली निघाली.
सदर लोकन्यायालयास पॅनल प्रमुख म्हणून, दिवाणी न्यायाधीश तसेच तालुका विधी सेवा समिती जामनेरचे अध्यक्ष दि.न. चामले यांनी कामकाज पाहिले. तर, पॅनल सदस्य म्हणून ॲड. अनिता. पी. पाटील यांनी कामकाज पाहिले. सदर लोकन्यायालयास जामनेर न्यायालयाचे सह. दिवाणी न्यायाधीश बी. एम. काळे व दुसरे सह दिवाणी न्यायाधीश पी. व्ही. सूर्यवंशी हे देखील हजर होते. सदर लोकन्यायालयाचे उद्घाटन करण्यापूर्वी दि.न. चांमले, बी. एम. काळे यांनी उपस्थित पक्षकार यांना विधी सेवेबाबत माहिती दिली. दरम्यान मध्यस्थी व लोकन्यायालयाचे महत्व पटवून सांगण्यात आले. दरम्यान ज्येष्ठ नागरिक कायदा, कौटुंबिक वाद, दिवाणी स्वरूपाचे वाद, फौजदारी केसेस, भारतीय राज्यघटना, नवीन तीन कायदे, बालकांचे हक्क व अधिकार,पोक्सो ॲक्ट, ग्राहकांचे हक्क व संरक्षण कायदा, या विविध विषयांवर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.डि.व्ही. राजपूत, यांनी केले. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष के.पी.बारी, सचिव डि.बी.गोतमारे, सरकारी वकील कृतिका भट, आर. आर. चव्हाण हजर होते. तसेच लोकन्यायालयाचे तडजोडीतून एकूण ०३ जोडपी त्यांचे सासरी नांदावयास गेली. तसेच इतर तीन कौटुंबिक वाद असलेल्या प्रकरणांत ॲड.के.डि. बनकर, ॲड.आशुतोष चंदेले, ॲड.व्ही.पी.वंजारी, ॲड.के.एच. चौधरी, ॲड. एस. वाय. वाघ, यांनी तडजोड यशस्वी घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. सदर लोक न्यायालयास बँक कर्मचारी बीएसएनएल, पंचायत समिती जामनेर, जामनेर पोलीस कर्मचारी, सर्व न्यायालयीन कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहकार्य केले.