चाळीसगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिलखोड शिवारात अलवाडी येथील युवक शेतात कामासाठी गेला असताना रानडुकराने भीषण हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली असून याप्रकरणी वनविभागाने माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली आहे.
बेलदारवाडी रस्त्यावर अलवाडी येथील सुनील साहेबराव अहिरे (वय २७) हा तरूण शेतकरी रविवारी सकाळी ७ वाजता आपल्या मालकीच्या मक्याच्या शेतात चारा काढण्यासाठी गेला होता. सकाळी ११ वाजेनंतरही तो न परत न आल्याने त्याचा शोध घेतला. दरम्यान शेतात मृत अवस्थेत तो आढळून आला.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला. त्याच्या मांडीवर जखमा आढळून आल्या. रानडुकराच्या हल्ल्यात तो ठार झाल्याचा प्राथमिक अंदाज ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंदार करंबेळकर यांनी व्यक्त केला. हल्ला झाल्यानंतर अतिरक्तस्राव झाल्यानेचं मृत्यू झाल्याचेही वैद्यकीय पथकाचे म्हणणे आहे.