वधू-वर परिचय मेळाव्याचे मंत्री गुलाबराव पाटील, आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते उद्घाटन
जळगाव, (प्रतिनिधी) : येथील शारदा एज्युकेशन फाउंडेशन व श्री संत जगनाडे महाराज बहुद्देशीय संस्थेतर्फे रविवारी राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा पार पडला. या तेली समाज मेळाव्यात ७ विवाह जुळले. तसेच मेळाव्यात १४०० हून अधिक विवाहेच्छुक युवक-युवतींनी नोंदणी करून परिचय करून दिला. विशेष बाब म्हणजे मेळाव्याच्या माध्यमातून जुळलेला एक आदर्श विवाह याच ठिकाणी पार पडला. नव वर-वधूला मान्यवरांनी शुभ आशीर्वाद दिले. शहरातील खान्देश सेंट्रल मॉल परिसरात आयोजित मेळाव्यामध्ये हजारोंच्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांच्यासह उद्योजक नंदू चौधरी, विनोद चौधरी, विजय चौधरी, धरणगावचे माजी नगराध्यक्ष संतोष चौधरी, सुरेश चौधरी, रामचंद्र चौधरी, निर्मला चौधरी, बबन चौधरी, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, दिंगबर चौधरी, शिवलाल चौधरी, माजी नगरसेवक दिंगबर चौधरी, ऍड. महेंद्र चौधरी, भास्कर चौधरी, मणिलाल चौधरी यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेले पदाधिकारी उपस्थित होते.
‘ब्रह्मगाठी’ वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन..
मान्यवरांच्या हस्ते ‘ब्रह्मगाठी’ या वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. ही पुस्तिका संपूर्ण राज्यात व देशातील काही भागातदेखील वितरित होत असते. मेळाव्याला गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
असे आदर्श विवाह अन्य समाजातही व्हावे.. – मंत्री गुलाबराव पाटील
समाजात पैसे खर्च करून मोठा विवाह करण्याची एक प्रथा पडली आहे. या प्रथेला तडा देत या नव वर-वधुनी समाजात एक नवीन ओळख निर्माण केली आहे. असा आदर्श विवाह इतर समाजातही व्हावे, असे आवाहन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तसेच त्यांनी नव वर-वधु यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
समाजापासून कधीही दूर जाऊ नका.. – आ. सुरेश भोळे
प्रत्येक समाजाने काळानुसार बदल करून सामाजिक विवाह सोहळ्यात सहभागासाठी होण्यासाठी पुढे यायला पाहिजे. पतंगाप्रमाणे आयुष्यात तुम्ही कितीही वर जा, मात्र ज्या समाजाने आपल्याला घडविले, मोठे केले, ओळख दिली. त्या समाजापासून कशीही दूर जाऊ नका, असे आमदार सुरेश भोळे यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रशांत सुरळकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन विशाल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले. यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष बबन चौधरी, सचिव रामचंद्र चौधरी, संदीप चौधरी, अमोल चौधरी, योगराज चौधरी, डॉ. दीपक चौधरी आदींनी परिश्रम घेतले.