जळगाव, (प्रतिनिधी) : येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एका ६७ वर्षीय महिला रुग्णावर तातडीने अत्यंत गुंतागुंतीची बायपास शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या महिलेच्या हृदयातील तीन प्रमुख रक्तवाहिन्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे ब्लॉकेजेस (Triple Vessel Disease) आढळून आले होते.
रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी कोणताही विलंब न करता तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. प्रसिद्ध हृदय व छाती शल्यचिकित्सक (CVTS Surgeon) प्रा. डॉ. यतीन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही ‘कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट’ शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली असून, सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर आहे.
या यशस्वी उपचाराबाबत माहिती देताना प्रा. डॉ. यतीन वाघ यांनी सांगितले की, “रुग्णाच्या हृदयातील तीनही प्रमुख रक्तवाहिन्यांमध्ये गंभीर अडथळे होते. अशा अत्यंत गंभीर परिस्थितीत वेळेवर बायपास शस्त्रक्रिया होणे रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. रुग्णालयातील अद्ययावत सुविधा आणि अनुभवी टीमच्या चोख समन्वयामुळे आम्ही ही तातडीची शस्त्रक्रिया यशस्वी करू शकलो. सध्या रुग्णाची प्रकृती समाधानकारक असून, पुढील काही दिवस त्यांना अतिदक्षता विभागात तज्ज्ञांच्या देखरेखीखाली निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.”
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात अनुभवी हृदयरोगतज्ज्ञ, निष्णात CVTS सर्जन, आधुनिक ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक ICU आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथक २४ तास सज्ज आहे. याच सुसज्ज पायाभूत सुविधांमुळे जळगावातच गंभीर हृदयविकाराच्या रुग्णांवर तातडीने आणि उच्च दर्जाचे उपचार करणे शक्य होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने या प्रसंगी अभिमानाने नमूद केले.








