जळगाव, (प्रतिनिधी) : महाविद्यालयातील रॅगिंगसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केवळ कागदी घोडे न नाचवता, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अँटी रॅगिंग कमिटीने थेट विद्यार्थ्यांच्या गराड्यात जाऊन संवाद साधला. विशेष म्हणजे, ही औपचारिक बैठक कोणत्याही बंदिस्त हॉलमध्ये न होता चक्क महाविद्यालयाच्या ‘अन्नपूर्णाालयम’ या भोजनालयात पार पडली. कमिटीच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांसोबत जेवणाचा आस्वाद घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
विद्यार्थ्यांशी थेट संवाद आणि मार्गदर्शन..
बुधवार, ६ मे रोजी महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. मेसमध्ये जेवणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कमिटीने रॅगिंगविरोधी कायद्यांची माहिती दिली. मेससारख्या सार्वजनिक ठिकाणी वावरताना शिस्त कशी असावी आणि एकमेकांशी सौहार्दाचे वातावरण कसे राखावे, यावर मार्गदर्शन करण्यात आले.
”विद्यार्थ्यांच्या मनात कोणतीही भीती राहू नये आणि त्यांनी मोकळेपणाने आपल्या अडचणी मांडाव्यात, हाच या मेसमध्ये घेतलेल्या बैठकीचा मुख्य उद्देश होता.” या प्रसंगी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, नशिराबाद पोलीस विभागाचे अतुल महाजन, डॉ. प्रेमचंद पंडित, ज्योत्स्ना भिरूड, अर्चना भिरूड, सुरेंद्र गावंडे, चेतन साखरे आणि ललित बोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
केवळ चर्चा न करता, कमिटी सदस्यांनी विद्यार्थ्यांसोबत बसून भोजन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या लहान-मोठ्या अडचणींवर डॉ. सोळंके यांनी संबंधित विभागांना तात्काळ सूचना देऊन कार्यवाही करण्याचे आदेश दिले. प्रशासनाच्या या ‘फ्रेंडली’ दृष्टिकोनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, हा उपक्रम महाविद्यालयाचा एक यशस्वी आणि आदर्श पायंडा ठरला आहे.







