जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील इंद्रप्रस्थ नगर येथील केशर बाग परिसरात संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त आयोजित चार दिवसीय महोत्सवाचा रविवारी (८ फेब्रुवारी) भक्ती आणि चैतन्याच्या वातावरणात समारोप झाला. ‘गण गण गणांत बोते’चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या पालखी सोहळ्याने संपूर्ण परिसर ‘शेगावमय’ झाला होता.
भक्ती अन् संस्कृतीचा संगम..
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. रविवारी संध्याकाळी श्रींच्या पालखीचे दिमाखात प्रस्थान झाले. या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले भाविक. डोक्यावर मंगल कलश घेतलेल्या महिला, पारंपारिक पेहरावातील पुरुष आणि लहान मुले यामुळे सोहळ्याला विशेष शोभा प्राप्त झाली होती. इंद्रप्रस्थ नगरातील विविध कॉलनींमधून ही शोभायात्रा काढण्यात आली, जिथे भाविकांनी रांगोळ्या काढून पालखीचे उत्स्फूर्त स्वागत केले.
नियोजनबद्ध सोहळा..
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष संतोष सोनावणे, सचिव गणेश शेळके आणि उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी योगेंद्र पवार, राजेंद्र बडगुजर, सतीश वाणी, प्रकाश शेवाळे, डॉ. सोपान पाटील, सतीश भोसले यांसह अनेक स्वयंसेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
महाप्रसादाने सांगता..
महोत्सवाच्या सांगता प्रसंगी आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. शिस्तबद्ध नियोजन आणि भाविकांच्या अलोट गर्दीमुळे हा सोहळा जळगावकरांसाठी अविस्मरणीय भक्तीचा अनुभव ठरला.








