जळगाव, दि.13 – शहरातील मुख्य रस्त्यांवर काही दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यात पावसाळा असल्याने पादचार्यांसह नागरिक व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात जळगावकर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात महापालिकेसह महापौर, उपमहापौरांकडे तक्रारी येऊ लागल्या होत्या. त्याचप्रमाणे सध्या गणेशोत्सव सुरू असून साधारण दीड दिवसांपासून गणरायाचे विसर्जन सुरू होते. या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांची डागडूजी करण्यात येत आहे.
यासंदर्भात महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पाठपुरावा करून पालिका प्रशासनाने शहरातील किमान मुख्य रस्त्यांवरील त्यात डांबरी व काँक्रीटच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा विषय गंभीरतेने घेऊन शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या प्रक्रियेस आठवडाभरापासून सुरूवात केली. यात सातत्याने मक्तेदारांकडून केल्या जाणार्या कामांसंदर्भातील नागरिकांची ओरड लक्षात घेऊन संबंधित रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामासाठी महापालिका प्रशासनाने स्वतःचीच संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरविली आहे.
सुरूवातीला शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम संपल्यानंतर पावसाळा संपताच इतर रस्त्यांच्या कामांनाही सुरूवात होईल. असे आश्वासन महापौर महाजन यांनी दिले. त्यासाठीही महापालिका प्रशासन व शासन दरबारी आमचा पाठपुरावा सुरू आहे, असे महापौर यांनी कळविले आहे.