जळगाव, दि.२१ – मराठी प्रतिष्ठानतर्फे महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असून त्यांना रिक्षा तसेच ई- रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. शासकीय बँकेच्या माध्यमातून रिक्षा उपलब्ध करण्यास मदत देखील करण्यात येत आहे. दरम्यान जळगाव शहरातील दोन महिलांना जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या हस्ते ई रिक्षा वितरित करण्यात आल्या.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वतः ई रिक्षा चालवत लाभार्थी दोन्ही महिलांना रिक्षात बसवून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात फेरफटका मारला व महिलांना शुभेच्छा दिल्या. मराठी प्रतिष्ठान मार्फत महिलांना ई रिक्षा उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी कौतुक केले व शहरांमध्ये जास्तीत जास्त महिलांनी ई रिक्षा घ्याव्या व आत्मनिर्भर व्हावे असे सांगितले. इ रिक्षेमुळे प्रदूषण कमी होईल व पर्यावरणाचा समतोल राखला जाईल असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
याप्रसंगी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष एडवोकेट जमील देशपांडे, विश्वस्त डॉ. सविता नंदनवार, निलोफर देशपांडे, ललित शर्मा, सतीश सैंदाणे, प्रकाश जोशी, नूर मोहम्मद शेख व महिला ई रिक्षा चालक रोशनी सावळे, हर्षला गुरव उपस्थित होते. मराठी प्रतिष्ठान तर्फे शहरांमधील ५० महिलांना ई रिक्षाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून शासकीय बँकांमधून कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष एडवोकेट जमील देशपांडे यांनी दिली.