जळगाव, दि.२१- परिवर्तन व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन आयोजित स्व पृथ्वीराज चव्हाण सांस्कृतिक महोत्सवात दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध लेखक रामु रामनाथन लिखित “शब्दांची रोजनिशी” या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. जगातील नष्ट होणा-या भाषां, शब्द यांच्या विषयीचा वेध घेणारे हे नाटक प्रेक्षकांना अंतर्मुख करून गेले.
भाषेवर होणारे आक्रमण, नष्टप्राय होत जाणारे शब्द व भाषिक संस्कृतीविषयीची प्रगल्भ जाणीव करून देणारे हे नाटक महोत्सवात सादर झाले. दिग्दर्शक अतुल पेठे व केतकी थत्ते यांच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांना उत्तम कलाकृती अनुभवता आली.
याप्रसंगी पद्मश्री भालचंद्र नेमाडे, कविवर्य ना धों महानोर, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन, माजी सनदी अधिकारी रविंद्र जाधव, विनोद देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मध्य प्रदेश सरकारचा कालिदास पुरस्कार विजेते चित्रकार शाम कुमावत यांचा सन्मान अशोक भाऊ जैन यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मानपत्राचे वाचन प्रतिक्षा कल्पराज यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रंगकर्मी मंजुषा भिडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद जंगम, राहुल निंबाळकर, अमित माळी, अक्षय नेहे, पंजकुमार पाटील आदी प्रयत्नशील होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे.
महोत्सवाला येणाऱ्या प्रेक्षकांनी कोरोनाचे नियम पाळत कार्यक्रमाचा आनंद घेतला. दोन लस घेतलेल्या प्रेक्षकांनाच देण्यात आला. महोत्सवाचा उद्या रविवारी “कबिर” या सांगीतिक कार्यक्रमाने समारोप होणार आहे.