जळगाव, (प्रतिनिधी) : शहराच्या स्वच्छतेबाबत वारंवार सूचना देऊनही कामकाजात सुधारणा न करणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन कंपनीला जळगाव महानगरपालिकेने अखेर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला निर्देश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठ महिन्यांतील ही पहिलीच अधिकृत नोटीस असल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष..
जळगाव शहर हद्दीतील कचरा संकलनाचे काम संबंधित कंपनीकडून समाधानकारक होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत होत्या. उपमहापौर मनोज चौधरी यांनी यापूर्वी अनेकदा संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींना आणि महापालिका प्रशासनाला प्रत्यक्ष सूचना देऊन कामाचा दर्जा सुधारण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रत्यक्ष जमिनीवर कोणताही ठोस बदल दिसून आला नाही. ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग आणि अनियमित संकलन यामुळे शहराच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असल्याचे चित्र होते.
उपमहापौरांचा संताप आणि कारवाईचे आदेश..
कामातील दिरंगाई पाहून उपमहापौर मनोज चौधरी यांनी कठोर पवित्रा घेतला. त्यांनी तातडीने आरोग्य अधिकाऱ्यांना पाचारण करून “प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका न घेता दोषींवर कारवाई करावी,” असे ठणकावून सांगितले. त्यांच्या या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने हालचाली करत संबंधित कंपनीला नोटीस बजावली आहे.
“शहर स्वच्छता ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. वारंवार सांगूनही जर कामात सुधारणा होत नसेल, तर आता केवळ नोटीसवर न थांबता संबंधितांवर यापुढे अधिक कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”
– मनोज सुरेश चौधरी,
उपमहापौर, जळगाव महानगरपालिका
आठ महिन्यांनंतर पहिलीच नोटीस..
मागील आठ महिन्यांच्या कालावधीत कंपनीला बजावण्यात आलेली ही पहिलीच अधिकृत नोटीस आहे. आता या नोटीसनंतर तरी शहरातील कचरा कोंडी फुटणार का आणि संबंधित कंपनी आपल्या कामकाजात सुधारणा करणार का, याकडे जळगावकर जनतेचे लक्ष लागले आहे.







