मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : राज्यातील वातावरणात सध्या मोठे बदल पाहायला मिळत असून, पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील विविध भागात संमिश्र हवामानाचा अनुभव येणार आहे. हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, १३ मार्च ते १७ मार्च दरम्यान राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
पावसाचा अंदाज (१३ ते १७ मार्च) मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टी वगळता, उर्वरित महाराष्ट्रात या पाच दिवसांत ढगाळ वातावरण राहील. काही मोजक्या ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. विशेषतः १५ आणि १६ मार्च रोजी पावसाचा जोर वाढू शकतो. या दोन दिवसांत खालील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह किरकोळ पावसाचा अंदाज आहे:
विदर्भ आणि मराठवाडा (संपूर्ण विभाग)
उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र: धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, अहिल्यानगर.
दक्षिण महाराष्ट्र: सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर.
उष्णतेच्या लाटेचा इशारा..
एकीकडे पावसाचे वातावरण असताना दुसरीकडे राज्याच्या काही भागांत सूर्याचा कडाकाही वाढणार आहे. १४ मार्चपर्यंत काही विशिष्ट शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती निर्माण होऊ शकते. यामध्ये खालील ठिकाणांचा समावेश आहे:
कोकण: अलिबाग, डहाणू.
उत्तर महाराष्ट्र: जळगाव, नाशिक.
विदर्भ: अकोला, अमरावती, बुलढाणा.
बदलत्या हवामानामुळे शेतीकामांचे नियोजन सावधगिरीने करावे आणि उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.







