जळगाव, (प्रतिनिधी) : जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुनीता येवले लिखित ‘मह्य आंगन’ या लेवा गणबोलीतील काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राचे संचालक प्रा. डॉ. म. सु. पगारे यांच्या हस्ते या संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून पिंपळनेर येथील प्रा. डॉ. सतीश म्हस्के उपस्थित होते. त्यांनी मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “साहित्य निर्मितीत स्थानिक बोलींची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. नवोदित कवी आणि लेखकांनी आपल्या मातृभाषेतूनच अधिक प्रगल्भपणे अभिव्यक्त होण्याची गरज आहे.”
ज्येष्ठ साहित्यिक अरविंद नारखेडे आणि जयश्री काळवीट यांनी ‘मह्य आंगन’मधील भावविश्वाचे कौतुक केले. जयश्री काळवीट म्हणाल्या की, “या संग्रहात ग्रामीण संस्कृतीचे आणि स्त्रीमनाचे सूक्ष्म चित्रण उमटले असून, लेवा गणबोलीतील अमूल्य शब्दांचा हा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. म. सु. पगारे यांनी आपल्या भाषणात मातृभाषेच्या संवर्धनासाठी अशा साहित्यिक उपक्रमांची गरज व्यक्त केली. त्यांनी विशेषतः पुस्तकातील कवितांसोबतच लेवा गणबोलीतील शब्दांचा प्रमाणभाषेत दिलेला अर्थ आणि काव्यानुरूप रेखाटलेल्या सुंदर चित्रांचे कौतुक केले. बोली भाषांमधून अशाच प्रकारचे दर्जेदार लिखाण होत राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या सोहळ्यास ‘आम्ही सिद्धलेखिका’ संस्थेच्या खान्देश विभाग प्रमुख प्रा. संध्या महाजन, तुषार वाघुळदे, श्री. झांबरे, पी. झेड. नारखेडे, रंजना भंगाळे, विनोद अढळके, प्रेम बडगुजर, भूषण अमोदेकर, तृप्ती शिर्के, ज्योती खरे यांसह विविध विभागांचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. भारती सोनवणे यांनी केले, तर आभार महेश सूर्यवंशी यांनी मानले.







