जळगाव, (प्रतिनिधी) : भरारी फाउंडेशनतर्फे आयोजित ‘बहिणाबाई महोत्सवा’त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘बहिणाबाई गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात देशभक्त सत्यनारायण बाबा मौर्य यांच्या प्रखर विचारांनी आणि देशभक्तीपर गीतांनी जळगावकरांमध्ये नवा उत्साह संचारला.
पुरस्कारार्थींचा गौरव..
समाजसेवा आणि आपल्या कार्यक्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या नंदलाल गादीया, राजेंद्र देशमुख, किशोर ढाके, डॉ. निलेश चांडक, किरण बच्छाव, सरिता खाचणे, भारती काळे आणि वसंत पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते ‘बहिणाबाई गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
संस्कृती आणि आरोग्याचा मंत्र..
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेले सत्यनारायण बाबा मौर्य यांनी आपल्या संबोधनात भारतीय परंपरा आणि संस्कृती टिकवण्याचे आवाहन केले. “आरोग्य आणि जीवनशैली सुधारण्यासाठी सकस आहार आणि व्यायाम ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी सांगितले. ‘लहानपण दे गा देवा’ या भावनेतून त्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला, तर गंगा नदीच्या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करत पर्यावरण रक्षणाची साद घातली. सीमेवरील सैनिक आणि महापुरुषांच्या विचारांप्रती कृतज्ञ राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मान्यवरांची उपस्थिती..
या सोहळ्याला जिल्हाधिकारी रोहन घुगे, रजनीकांत कोठारी, माजी आमदार मनीष जैन, निर्णय चौधरी, गोसेवक अजय ललवाणी, अनिल कांकरिया आणि रवींद्र लड्डा यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी घुगे यांनी आपल्या मनोगतातून महोत्सवाच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. विनोद ढगे यांनी आपल्या खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून कार्यक्रमात रंगत आणली.
भरारी फाउंडेशनच्या या उपक्रमाला जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाद दिली. गोवंश जतन आणि संवर्धनासाठी मौर्य यांनी दिलेल्या मोलाच्या टिप्स उपस्थितांसाठी मार्गदर्शक ठरल्या.







