जळगाव, (प्रतिनिधी) : मराठी भाषेचे महत्त्व आणि मराठी शाळांची सद्यस्थिती मांडणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या चित्रपटाचा विशेष खेळ आज जळगाव येथील महानगरपालिका केंद्र शाळा क्रमांक २ च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने प्रसिद्ध मराठी अभिनेते सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचा आनंद द्विगुणित केला.
अर्चना राणे यांच्या पुढाकाराने विशेष उपक्रम..
महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना चित्रपट पाहण्याची संधी मिळावी आणि त्यांच्या मनात मराठी भाषेबद्दल अभिमान जागृत व्हावा, या उद्देशाने अर्चना राणे यांनी या विशेष खेळाचे आयोजन केले होते. अनेक विद्यार्थी पहिल्यांदाच वातानुकूलित चित्रपटगृहात मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहत होते. यावेळी मुलांसाठी खाऊ आणि शीतपेयांचीही व्यवस्था करण्यात आली होती.
कलाकारांनी दिला मोलाचा संदेश..
चित्रपट संपल्यानंतर सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ यांनी थेट थिएटरमध्ये प्रवेश करताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. यावेळी कलाकारांनी विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. ”मराठी भाषा जगवा आणि मराठी शाळा टिकवा, हाच आपल्या संस्कृतीचा पाया आहे,” असा मोलाचा संदेश यावेळी कलाकारांनी दिला. आपल्या लाडक्या अभिनेत्यांना समोर पाहून विद्यार्थी भारावून गेले होते. यावेळी चित्रपटाच्या दिग्दर्शकांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न..
”मराठी भाषा आता ‘अभिजात’ झाली आहे, पण मराठी शाळा कधी अभिजात होणार?” हा ज्वलंत प्रश्न या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला. मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम स्तुत्य असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या आगळ्यावेगळ्या अनुभवाबद्दल शाळेच्या वतीने आयोजक अर्चना राणे यांचे आभार मानण्यात आले.








