जळगाव, ( प्रतिनिधी) : येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने ३० सप्टेंबर रोजी कांताई सभागृहात आयोजित ‘गांधीतीर्थ देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा’ मोठ्या उत्साहात संपन्न झाली. शहरी आणि ग्रामीण अशा दोन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत एकूण १९ संघांनी सहभाग घेतला. देशभक्तीपर गीतांनी सभागृह भारावले आणि उपस्थितांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
स्पर्धेची सुरुवात डॉ. स्मिता पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. या स्पर्धेसाठी विशाखा देशमुख, वृषाली जोशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रत्येक संघाने देशभक्तीने प्रेरित गीते सादर करत उपस्थितांची मने जिंकली. सादरीकरणात गांधीजींच्या अहिंसा, सत्य आणि स्वदेशीच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला. स्पर्धेत सहभागी सर्व संघांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश कुळकर्णी यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुधीर पाटील, अशोक चौधरी, चंद्रशेखर पाटील, प्रशांत सूर्यवंशी, चंद्रकांत चौधरी आणि विक्रम अस्वार यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेतील विजेत्यांना महात्मा गांधी जयंतीच्या कार्यक्रमात २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी उद्यानात पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.